आजरा (हसन तकीलदार ):-डिजिटल आणि प्रगत युगात जग संकुचित होऊन जवळ आले आहे. सेकंदात माणूस अमेरिकेशी संपर्क साधू शकतो. क्षणात जगाचा आढावा घेऊ शकतो परंतु घराच्या भिंतीला लागून असलेल्या भिंतीपलीकडे असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांशी आपला संपर्क तुटत चालला आहे. जो तो आपापल्या जगात व्यस्त आहे. प्रगत युगात माणसाची माणुसकी हरपल्याचे चित्र दिसत आहे. भाऊबंदकी टोकाची झाली आहे. शेतातील एक ओपा आणि घरातील एक सोपा यासाठी सख्ख्या भावाभावांच्यामध्ये धुसपूस पहायला मिळते आहे. विथभर जागेसाठी माणूस माणसाच्या जीवावर उठत आहे. सरकारी नोकरी करणारा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला भाऊंसुद्धा शेतात शेतात राबून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी भावाला वाटणीमध्ये एक इंच जागा सोडायला तयार नाही. शिक्षण घेऊन परदेशात गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना आपल्या जन्मदात्यांचे ओझे होत आहे. वृद्धाआश्रमात भर पडत आहे. तर शेतात राबणारा शेतकरी पुत्र आपल्या माता पिताला आधार देत आपलं कर्तव्य पार करीत आहे. अशा या माणुसकी हरपलेल्या जगात आजऱ्यातील शिक्षक सुनील शिंदे यांनी आपल्या गावातील किणे येथील स्वतःच्या वाटणीस आलेली घर आणि शेती आपल्या मोठ्या भावाच्या अपंग मुलीस देऊन माणुसकीचे दर्शन दिले आहे.
यावेळी शिंदे म्हणाले की, किणे गावात वडिलोपार्जित शेती आणि घर होते परंतु मोठया भावाची मुलगी अपंग असल्याने त्याचप्रमाणे तिच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपल्याने या मुलीला मी माझ्या मुलीप्रमाणेच वागणूक दिली आहे. किणे विद्यामंदिरात अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीस लावले तिच्या वडिलांचे छत्र हरपल्याने ती मला पित्याच्या रूपात बघत होती. मी शिक्षक म्हणून काम करीत असल्याने माझी आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. त्यामुळे किण्यातील माझ्या वाटणीला आलेले घर व शेती मी स्वखर्चाने मुलीच्या नावावर करून दिले.
सुनील शिंदे सरांनी खरोखरच माणुसकी जपली आहे. आजच्या माणुसकी हरपलेल्या युगात एक इंच जागा आपल्या सख्ख्या भावाना कोण सोडत नाही परंतु शिंदेनी आपले मन मोठे करीत आपल्या वाटणीला आलेली सगळी स्थावर मालमत्ता, शेती भावाच्या अपंग मुलीच्या नावावर स्वखर्चाने करून देऊन समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. बालपणी शिंदेनी गरिबीचे चटके सहन केले आहेत. डी. एड. झाल्यानंतर त्यांनी पत संस्था, कारखाना याठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु सहकारात शिक्षणापेक्षा, कार्यक्षमतेपेक्षा वशीला महत्वाचा असतो. वशीला नसल्यामुळे त्यांना त्यावेळी नोकरी मिळाली नाही परंतु काही दिवसांनी त्यांना शिक्षकाचा कॉल आला आणि त्यांना शिक्षकाची नोकरी लागली. येथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. गरिबीला त्यांनी सोसलंय, भोगलंय आणि जवळून पाहिलंय त्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे. म्हणूनच ते म्हणतात, मरावे परी कीर्ती रुपी उरावे. शिक्षणाबरोबर शिलही सुधारले पाहिजे. केवळ शिक्षित होऊन चालणार नाही तर शिक्षणाबरोबर संस्कारही जपले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्रात आपण शिव शाहुंचे वारस म्हणून जगत आहोत त्यांचे आदर्शही आपल्या जीवनात जोपासले पाहिजे. त्यांच्या या दानत्वाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे…
अश्याच बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करून आमच्याशी जोडले जा….
यूट्यूब लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=zZp9YPoR3HWvLeFD
व्हॉट्सअँप चॅनेल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

मुख्यसंपादक