आज समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना आपली वृत्तपत्रात बातमी आली पाहिजे असं वाटतं, बातमी प्रकाशित होईपर्यंत दोन चार वेळेस कॉल पण करतात पण एकदा का बातमी प्रकाशित झाली व ती ई पेपर मुळे वाचायला मिळाली तर मग साधा 5 रुपये किमतीचा पेपर पण विकत घ्यायची तसदी घेत नाही. बातमी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धी सोबत ईतर लाभ पण हवे.पण वृत्तपत्र नको.एखादा हौशी बातमी आल्यावर मित्रांना हजार रुपयांची पार्टी देईल पण नियमित पेपर लावणार नाही आपण सहज कारण विचारलं तर उत्तर येतं कोरोना.
लग्नात जातांना कोरोना नाही,
गावाला जातांना कोरोना नाही,
कार्यालय व बाजारात जातांना कोरोना नाही,
कुठेही जातांना कोरोना नाही,
भाजी,किराणा व ईतर वस्तू घरी येतात तेंव्हा कोरोना नाही,
एवढेच काय दुसऱ्याची नोट व चिल्लर घेतांना तो विसर्जन पावतो,मग वृत्तपत्र घरी येतो तेंव्हाच हा घरी का येतो ?
कोरोना एवढा कसा तू मतलबी झाला ?
या मतलबी करोनामुळे वृत्तपत्र व्यवसायातील अनेकांचे कंबरडे मोडले,अनेकांना रस्त्यावर आणले,कित्येकांचा पोटचा घास गेला .किमान ज्यांनी या काळात पूर्ण वेळ व्यवसाय व नोकरी करून पूर्ण पगार घेतला किमान त्यांनी तरी विचार करायला हवा.कारण प्रश्न अनेकांच्या उदरनिर्वाहाचा आहे.ज्याप्रमाणे निसर्गात एखाद्या मुंगी पासून हत्ती पर्यंत जैवविविधतेची साखळी चालते त्याचप्रमाणे वृत्तपत्र व्यवसायात सुद्धा ही साखळी चालते.
एका वृत्तपत्राच्या व्यवसायात संपादकीय विभागात संपादक पासून ते पत्रकार पर्यंत,जाहिरात,विपणन व्यवस्थापन,पासून ते हॉकर्स पर्यंत ,शिवाय ग्रामीण भागातील पत्रकाराच्या व्यथाच वेगळ्या (तो केवळ मान मिळणाऱ्या धनावर काम करतो त्याला धड रुपयाच्या स्वरूपात मोबदला पण नसतो) असे एकमेकांवर असलेल्या लोकांची साखळी चालते.बरं वृत्तपत्रात ज्यांच्या नेहमी बातम्या प्रकाशित केल्या जातात अश्याच हक्काच्या व्यक्तींना पत्रकार दिवाळी व ईतर मोठ्या उत्सवा दरम्यान (काही पितपत्रकारिता करणारे महाभाग वगळून) जाहिरातीची मागणी करतो (जो देऊ शकतो अश्यानाच) पण ते सुद्धा ऐनवेळी दहा कारणे सांगतात.त्यांना हवी असते ती केवळ प्रसिद्धी.पण त्याची किंमत मोजावी लागते त्या पत्रकार व जाहिरात विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना.
अन्याय झाला तर आठवतो तो पत्रकार,
छटाकभर यश मिळालं तर आठवतो पत्रकार,
नोकरीत लाभ मिळाला नाही तर आठवतो पत्रकार,
पगार उशिरा झाले तर आठवतो पत्रकार,
स्वतःच्या संघटनेच्या बातम्या लावण्यासाठी आठवतो पत्रकार,
एखाद्याचा काटा काढून स्वतःचा उल्लू सिधा करण्यासाठी पण पत्रकार, पोलीस,न्यायव्यवस्था, मनपा,जिल्हा परिषद,विद्यापीठ असो वा कुठलीही शासकीय,निमशासकीय वा खाजगी,जर या व्यवस्थेत काम नाही झाले तरी आठवतो पत्रकारच . कोरोना काळात स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून इतरांच्या सोयीसाठी धावला तोही पत्रकारच.(त्यात अनेक जण निसर्गाला प्रिय पण झाले.)
मग घरच्या वृत्तपत्र सुरू करण्यासाठी त्याची का आठवण येत नाही. तेंव्हा कोरोना आडवा का येतो ?
एक अनुत्तीर्ण प्रश्न माझ्या वृत्तपत्रातील वाचकांसाठी…..?
लेखक – आपलाच एक पत्रकार
![](http://linkmarathi.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-14-at-5.30.29-PM.jpeg)
मुख्यसंपादक