महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजना, आयुष्यमान योजना तसेच डायलेसिस सेंटरचे नाम. आबिटकर यांचे हस्ते लोकार्पण सोहळा.
आजरा (हसन तकीलदार ):-मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे मोफत सुरु करण्यात आलेल्या डायलेसिस सेवा केंद्राचे लोकार्पण सोहळा नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. तर प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, गरीब रुग्णाला डायलेसिस सेंटरचा उपयोग व्हावा यासाठी नाम. आबिटकर यांनी राज्यात 449आणि जिल्ह्यात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु केले आहेत. पैकी 50डायलेसिस केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. महात्मा जोतिराव फुले योजना खाजगी रुग्णालयाबरोबरच ग्रामीण रुग्णालयातही सुरु केली आहे. त्यामुळे याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याला शासनाकडून राज्यात 360 रुग्णवाहीका देण्यात आल्या असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 9रुग्णवाहीका मिळाल्या आहेत. आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर मध्ये 5अत्याधुनिक बेड व डायलेसिस मशीन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे गरीब रुग्णांची होणारी परवड थांबणार आहे. होणारा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे आणि रोज शहरी भागाकडे करावा लागणारा प्रवास बंद होणार आहे. त्याचप्रमाणे बॉंबे नर्सिंग ऍक्टमध्ये बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे.सर्व प्रकारच्या सेवा ग्रामीण रुग्णालयात देण्याचा व महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे ती सर्व पदे भरणार असल्याचा मानस नामदार साहेबांचा आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्य व पालक मंत्री नाम. आबिटकर म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गोरगरीब रुग्णांना शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे काम होणेसाठी ग्रामीण स्तरावर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. डायलेसिस सेंटरमुळे रुग्णांचा आर्थिक भार तर कमी होणार आहेच त्याचप्रमाणे त्यासाठी जो प्रवास करावा लागत होता तो थांबणार आहे. शहरात न जाता तो याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव,तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढसाळ, माजी नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, जयवंतराव शिंपी, विलास नाईक, विजय पाटील, सुधीर कुंभार, राजेंद्र सावंत, परशुराम बामणे, विजय थोरवत, गोविंद गुरव, शरीफ खेडेकर, जितेंद्र भोसले, संतोष भाटले, असिफ पटेल, अमानुल्ला आगलावे, सुरेश होडगे, संजय पाटील आदिजण उपस्थित होते. आभार डॉ. सुरजीत पांडव यांनी मानले

मुख्यसंपादक