Homeमुक्त- व्यासपीठउंबराचे फुल- संस्कारमुर्ती श्री. एस.बी. पाटील सर

उंबराचे फुल- संस्कारमुर्ती श्री. एस.बी. पाटील सर

सुख हे एखाद्या वार्‍यासारखे फुंकर मारून मनाला सुखाचा ओलावा देते, तर दु:खाचे वारे हे उन्हाळ्यातल्या गरम वार्‍यासारखे चटके देऊन जाते. आयुष्यात आलेली सुख दु:खं ही झोपाळ्यासारखी कधी मागे, तर कधी त्याच वेगाने पुढेही निघून जातात. मात्र अशा दोन्ही वेळेस मनाला कसे सावरावे, हे सांगणारे क्षण कधीच विसरता येत नाहीत.

त्यापैकीच एक २००५ सालीची ही गोष्ट‌‌…

सायन्सला अॅडमिशन घेतल्यानंतर सुरवातीला केमिस्ट्री विषयातील रासायनिक संयुगे, त्यांची रेणू सुत्रे पाहीली की वाटायचं लॅबमधील अनेक रसायनांची डोक्यात नुस्ती घुसळणच सुरू होईल की काय… पण शरीराने उंच, धडधाकट, ऐन पस्तीसीत अभिनेत्यासारखे दिसणारे पाटील सर यांनी वर्गात पाऊल टाकले, की एक खांदा किंचितसा उडवून हसतमुख चेहऱ्याने सर्वांवर नजर फिरवायचे आणि नंतर शिकवायला सुरुवात करायचे. केमिस्ट्रीतील प्रत्येक मुद्दा जसं विनोदी किस्सा सांगितला जातो तसं ते सांगायचे. यामुळे केमिस्ट्री विषयासह सरांची आणि विद्यार्थ्यांची चांगलीच केमिस्ट्री जुळलेली. त्यामुळे शिकत असताना कधी कोणाच्या डोक्यात रंगीत, गुलाबी दुनियेचा ‘केमिकल लोच्या’ होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

बारावीत असताना एके दिवशी, वर्गात त्यांनी ‘तुला शिक्षण घेऊन पुढे काय व्हायचे आहे?’, हे प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले होते. काहींनी ठरवून, तर काहींनी पुढचा काय सांगतोय ते ऐकून, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर अशी वेगवेगळी उत्तरे दिली. अनेकांच्या निरनिराळ्या उत्तरांवर सर्व जण हसायचे.(मी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जसे नाव कमावले, तसं ‘मी सुभाषचंद्र होईन’,असे सांगितले होते. हे असं वेगळंच उत्तर ऐकून अजूनच सगळे हसायला लागलेले.)

सायन्सच्या वर्गात आम्ही जवळपास साठ एक विद्यार्थी असेन. त्या सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव ,गाव यांची सर्व माहिती पाटील सर यांना माहीत होती. इतकंच नव्हे, तर आम्हाला सायन्सला केमिस्ट्री विषय शिकवणारे पाटील सर अकरावी-बारावी आर्ट, कॉमर्सच्या वर्गातील सुद्धा तीन साडेतीनशे मुला-मुलींना त्यांच्या नाव, आडनावावरून ओळखत होते. यावरून त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्यांप्रती असणारा ऋणानुबंध लक्षात येईल…

पाटील सर कधी कुणाला रागाने बोललेत किंवा ओरडलेत, असं सहसा कधी मी बघितलं नाही. पण योग्य वेळी समोरच्याला बरोबर लागतील अशा ‘शब्दांच्या कोपरखळ्या’ मात्र ते हसत हसत देत असत. वर्गात प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांच्या हातात अंगठ्याच्या जाडीची, हातभर लांबीची छडी असायची. उत्तर चुकले तरी चालेल, पण प्रत्येकाला बोलतं करायचे आणि उत्तरच न देणाऱ्याला मात्र प्रसाद घ्यावा लागायचा. त्यांच्या तासाला खेळीमेळीच्या वातावरणामुळे त्यांनी छडी मारलेल्याचे विद्यार्थ्यांना एवढे विशेष काही वाटत नसायचे.
त्यांच्या हातातली नुसती छडी जरी बघितली, तरी आमच्या डोक्यातली कॉलेजची सारी हवा निघून जायची. वाटायचं ‘आम्ही कॉलेजमध्ये नसून, अजून हायस्कूलमध्येच आहोत!’

दुपारी बारा वाजता कॉलेज सुटायचे. त्यानंतर पाच वाजेपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीन विषयांची प्रॅक्टिकल्स असायचे.

बारावीच्या परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले पाहिजेत, यासाठी लॅबमध्ये प्रॅक्टिकल नसेल त्या दिवशी सुद्धा सगळ्यांना दुपारी बारानंतर संध्याकाळी किमान पाच वाजेपर्यंत सक्तीने अभ्यास करत बसायला सांगितले गेले होते.

सर्व जण एकाच ठिकाणी बसल्यामुळे अभ्यास कमी, गप्पाच जास्त रंगत होत्या, त्यामुळे कॉलेजच्या तीन मजली इमारतीत सर्वांना सुट्टे सुट्टे बसून अभ्यास करायला लावले होते.

आमचं बारावीचे महत्वाचे वर्ष चालू असूनही, आम्ही दुपारनंतर कॉलेज बाहेरच्या शेताजवळ एका मैदानावर क्रिकेट खेळत असायचो. शिक्षकांच्या सक्तीमुळे आमच्या क्रिकेट खेळण्यावर मर्यादा आलेल्या. यामुळे अनेकांची बांधून ठेवल्यासारखी अवस्था झाली होती.

क्रिकेट खेळण्याच्या वेडामुळे दोघा तिघांनी यावरही शक्कल लढवली. कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक सभागृह आहे. तिथे काही कार्यक्रम असेल तरच बसण्याची व्यवस्था करून तो खूला केला जात असे. बाकी वेळी तो हॉल पुर्ण मोकळा व बंद असायचा.

एकाने जुन्या मोडलेल्या बेंचचे बॅटच्या आकाराचे फाळकूट व बॉल घेतला व पाच सहा जणांसोबत त्या हॉलमध्ये पोहचलो. बॉलने बाजूच्या स्लायडींग खिडक्यांच्या काचा फुटतील, हे लक्षात आल्यावर रबरी बॉल ऐवजी खोडरबर चा बॉल म्हणून उपयोग केला.

एक टप्पा आऊट नियमानुसार खेळात रंगत येत होती. किरण कांबळे, निलेश सावंत, उद्धव महाडिक, संदिप शिंदे, अभिजित बाबर, मिलिंद आंबवडे, महेश सावंत, गणेश महाडिक…इ. आणि मी. असे सात आठ जण सलग दोन तीन दिवस क्रिकेट खेळत होतो. रोज दुपारी बारा नंतर आम्ही कुठे गायब होतोय हे कुणालाच माहीत नसायचे.

एके दिवशी, नेहमीप्रमाणे हॉलमध्ये दरवाजा, खिडक्या बंद करून आम्ही क्रिकेट खेळू लागलेलो, तितक्यात बाहेरून कुणीतरी दरवाजावर थाप मारत आवाज देऊ लागलं. आवाजावरून अभिजित शिंदे आहे असे जाणवत होते. ‘मी पण तुमच्यासोबत खेळायला आलोय. मला आत घ्या’ म्हणून तो बाहेरून विनंत्या करत होता, पण आदल्या दिवशी आम्ही त्याला ‘खेळायला चल’ म्हणून आग्रह केला होता, तरीही तो आला नाही. त्यामुळे त्याला आत घ्यायचाच नाही, असे म्हणत त्याला तरसवण्यासाठी आम्ही दरवाजा उघडलाच नाही.

खेळताना दंगामस्ती, आवाजाने हॉल नुसता दणाणून गेला होता. दरवाजा, खिडक्या बंद असल्याने आमचा आवाज बाहेर, खालच्या मजल्यावर जात नाही, याची दोन दिवसांपूर्वी आम्ही खात्री करून घेतली होती. सगळे बिनधास्त, मजामस्ती करत क्रिकेट खेळण्यात दंग होतो.

काही वेळाने अजून जोरजोरात दरवाजा थपथपाटत ,”अरे खेळायचं बंद करून लवकर बाहेर या. दरवाजा उघडा. सर इकडेच यायला लागले आहेत.” असा अभिजितने आवाज दिला. आपली क्रिकेट खेळायची हौस अजूनही पूर्ण होऊ शकते, या आशेने तो सरांचा धाक दाखवून, दरवाजा उघडण्यासाठी खोटं बोलत असेल व दरवाजा वाजवत असेल म्हणून आम्ही कुणीही तिकडे लक्ष न देता आम्ही आमच्या क्रिकेटच्या खेळात गुंग झालो.

काही वेळानंतर दाराच्या फटीतून मोठ्याने वेगळ्याच आवाजात दोघा तिघांची नावे घेतलेल्याचा कानावर हलकासा आवाज आला, तसं सगळे जागच्या जागी स्तब्ध, शांत झाले. आवाज खूपच ओळखीचा होता. कुणीतरी हातातली लाकडी फळी घाई गडबडीत कुठेतरी लपवली आणि सर्वजण बंद दरवाजाजवळ गेलो.
दरवाजा उघडायला पुढे कोणीही धजावेना. प्रत्येक जण एकमेकांच्या आडोश्याला दडत होता. पुढे कोणी व्हायचं हा गहन प्रश्न निर्माण झालेला. तितक्यात पुन्हा, ‘किरण दरवाजा उघड’ ,असा
बाहेरून आवाज आला. तसं नाईलाजास्तव किरण पुढे झाला. उघडू का नको, उघडू का नको करत दाराची कडी काढली अन्
हळूहळू दरवाजा उघडला.
तसं समोर हातात काठी, अन् गंभीर चेहरा करून पाटील सर उभे…!!!

सरांना अशा अवतारात समोर पाहिलं आणि अंधारात चाचपडत चालत असताना अचानक आलेल्या लाईटच्या प्रखर उजेडाने डोळे दिपून जावेत, अन् पुढचं काही दिसायचंच बंद व्हावं, अशी माझी अवस्था झालेली.

महाभारतातील संजय हा आपल्या दिव्य दृष्टीने कुरूक्षेत्रावर घडत असलेल्या युद्धाचा ‘आँखो देखा हाल’ जसं आंधळ्या धृतराष्ट्रला सांगत होता, अगदी तसंच काहीसं त्यावेळी झालं असावं व वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहामध्ये आम्ही क्रिकेट खेळतोय, हे त्यांना समजलं असावं.

त्यांच्या हातातली काठी बघून काळजात धस्स् झालं. त्यांचा आम्ही सर्वच जण आदर करत होतो. त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर द्यायचे आमच्यापैकी कुणाचेच धाडस होत नव्हते. पाटील सर आत आले. आतून दरवाजा लाऊन घेतला आणि कडी लाऊन घेतली. आता मात्र ते एकेकाला फोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत. भितीने हृदयाचे ठोके वाढायला लागलेले. माराची भिती होतीच, पण आम्ही त्यांच्या नजरेत गुणी विद्यार्थी होतो. त्यांनी आमच्यावर गुणवंतपणाची पांघरलेली झालर त्यांच्याकडूनच अशी उतरवली जाणार. याची मनाला बोचणी लागलेली. मनात नुस्ती कालवाकालव सुरू झालेली.

पाटील सर काही बोलायच्या आत किरण आतून घाबरून गेलेला, तरीही तोंडावर उसने हसु आणत बोलला, ” सॉरी सर, चुक झाली. पुन्हा असे नाही करणार. एवढ्या वेळी माफ करा.” त्याच्या सुरात सूर मिसळून आम्हीही तोंडावर उसने हसु आणत सॉरी सर, सॉरी सर म्हणू लागलो.

” हॉलमध्ये क्रिकेट खेळत होतात, तेही तुम्हाला अभ्यास करत बसायला सांगितलेल्या वेळेत.. अभ्यासाचे कुणालाच गांभीर्य नाही. ही तुम्हा सर्वांना चुक मान्य आहे. चुक केली आहे तर शिक्षा ही मिळायलाच पाहिजे.” एकेकाकडे पाहत, “काय संदिप? निलेश? महेश? उद्धव?…? सुभाष? (इतर वेळी प्रेमाने, गंमतशीरपणे ‘सुभाषलाला’ या नावाने संबोधणारे पाटील सर, आज यावेळी फक्त ‘सुभाष’ या एकेरी नावानेच बोलत होते. फक्त या एकेरी नामोल्लेखानेच मीच माझ्या नजरेत अक्षरशः संपून गेलो. पाण्यात ढेकळ विरघळावा तसा विरघळून गेलो.)
काय किरण बरोबर ना? “
आम्ही सगळे अपराधीपणाच्या भावनेने माना खाली घालून निशब्दपणे उभे.
“घे. हात पुढे घे.”, असे म्हणत त्यांनी छडी मारायला वर उचलली.
सर्वांत पुढे किरण होता, त्यामुळे सहाजिकच त्याने घाबरत घाबरत हात समोर केला. छडी जोरात उगारलेली बघून त्याने खसकन हात मागे घेतला. पुन्हा एकदा घाबरत घाबरत हळूहळू हात पुढे केला आणि डोळे गच्च मिटून घेतले.
तो क्षण, ती अवस्था बघून आम्हीही फुलांच्या पाकळ्या चुरगळतात तशी बोटं तळ हातावर चुरगाळत, हातावर फुंकर मारत छडीचा मार घ्यायला सज्ज होत होतो.
पण घडले वेगळेच अनपेक्षितपणे पाटील सर यांनी छडी मारताना हात मागे घेवू नये, यासाठी किरणच्या हाताची बोटे पकडून धरण्यासाठी स्वतःचा हात पुढे केल्यासारखे करून. किरणच्या हाताच्या वरच्या बाजूला हात केला व स्वतःच्याच तळ हातावर जोर जोराने छडी मारायला सुरुवात केली. आम्हाला समोर काय घडतंय हे कळायच्या आत सलग तीन चार छड्या मारून झाल्या होत्या. हाताला झिणझिण्या आल्याने त्यांनी हात खाली घेत दोन वेळ झिंजडला आणि पुन्हा हात वर घेऊन पुन्हा हातावर छडीचा मार घ्यायला सुरुवात केली. समोर उभा असलेल्या किरणचे खाडकन डोळे उघडले. किरण आणि अजून दोघा तिघांनी छडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हात धुडकावून लावत पुन्हा जोरजोराने हातावर छडीचा मार देऊ लागले.
आमच्यातल्या एक-दोघांनी पुढे होऊन त्यांचा छडी लागलेला हात पकडला आणि भिजल्या डोळ्यांनी म्हणालो, ” सॉरी सर, सॉरी सर आमची चूक झालीली, तुम्हाला असा त्रास करून घेऊ नका? आम्हाला शिक्षा करा.”

“शिक्षा व्हायलाच पाहिजे, तुम्हाला नव्हे, तर मला. तुम्ही तुमच्या बाजूने बरोबर असाल. तुमचं काहीच चुकलं नाही, माझीच चुक झाली. मीच माझ्या बाजूने तुम्हाला समजावण्यात कमी पडलोय. आम्ही तुम्हाला संस्कार द्यायला कमी पडलोय, त्यामुळे मला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”

सरांची अशी भावनिक साद ऐकून काळजाला चिमटा बसला. मनात कालवाकालव झाली. कंठ दाटून आला. क्षणात आमच्या सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले.

“सर दोन छड्यांच्या जागी चार मारा. आठ मारा. वाट्टेल तितके मारा. आम्हाला वाट्टेल ती शिक्षा करा, पण सर… आमच्यामुळे तुम्हाला असा त्रास करून घेऊ नकोसा. आम्ही आजपासून अजिबात क्रिकेट खेळणार नाही. फक्त अभ्यासच करणार. आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे कधी आम्ही वागणार नाही.”, असे म्हणत आम्ही सर्वांनी सरांना हात जोडले आणि काळवंडलेल्या मनाने विनवण्या करत, ‘सॉरी सर, सॉरी सर’, म्हणू लागलो.

सरांनी ज्या हातावर छडीचा मार घेतला होता, त्या गोऱ्या हातावर काही क्षणातच छडीच्या माराने लाल निळसर रंगाचा जाड वळ उमटलेला. त्यामुळची ती दाहकता मनाला अजूनही सुन्न करणारी आहे.

आई आपल्या मुलाला शिक्षा करते व नंतर प्रेमाने आपल्या पोटाशी कवटाळून धरते. काहीसे असेच भाव त्यावेळी सरांच्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून मला वाटले.

त्या दिवशी त्यांनी छडीचा त्यांच्या हातावर नव्हे, तर आमच्या भरकटणाऱ्या मनावर वार केला. विद्यार्थी भावनिकदृष्ट्या शिक्षकांशी जोडले गेलेले असतात, पण शिक्षक सुद्धा तितक्याच भावनिकतेने विद्यार्थ्यांशी जोडलेले असतात. हे त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

आदरणीय एस. बी. पाटील सर यांच्या सोबतच्या अशा अनेक आठवणी आहेत, की ज्यामुळे त्यांना संस्कार मुर्ती, उंबराचे फुल (अतिशय दुर्मिळ व्यक्ती) म्हणावंसं वाटतं. ते माझ्यासह प्रत्येकाला माझेच वाटतात.

ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण होऊन आज पंधरा-सोळा वर्षे झालीत, तरीही तेथे मिळालेल्या पुस्तकी शिक्षणाचा उपयोग पैशाच्या जगात किती होतोय, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण बिघडण्याच्या काळात आम्हाला घडवण्याचं काम मात्र पाटील सर आणि तेथील सर्व शिक्षकांनी केले; हे ठामपणे सांगता येईल.

आदरणीय रहमान एम. शिकलगार सर (physics),
संजय बी. पाटील सर (Chemistry),
शबनम मनेर मॅडम(English),
अंजली शिंदे मॅडम( Biology),
सुवर्णा पाटील मॅडम (Math’s)
विजय सातपुते सर (मराठी) यांनी शिक्षणासोबतच शहाणपणाची, संस्कारांची जी भक्कम शिदोरी दिली आहे. ती अजून भरून उरली आहे, असं मला वाटतं.

✍️_सुभाष मंडले
(९९२३१२४२५१)

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

24 COMMENTS

  1. नमस्कार सर…🙏🚩
    खूप छान मांडले आहे सर्व.
    पाटील सर आजूबाजूला आहेत याचा भास मला होत होता. तोच भास नक्कीच वाचकांना होईलच असे मला वाटते. हसून शिकवणे, एखाद्याला दिलेली मिश्कीलपणे कोपरखळी मला खूप भावली.

    असे शिक्षक असतील तर आताची पिढी आनंदाने शिकण्यास शाळा, कॉलेज मध्ये जातील. मनमिळावू पण तितकेच वक्तशीर असे शिक्षक आताच्या घडीला मिळणे कठीण आहे.

    खूप छान लेख आहे; आणि एका आदर्श शिक्षकाचे लेखन आपण केले ते आम्हां वाचकांपर्यंत पोहचविले यासाठी खरंच आपले मनापासून धन्यवाद…!!💐

  2. पाटील सर यांची प्रतिक्रिया…
    Thank you very much Subhash.
    What I like most is your command on writing. Really you are a very much good writer of future. I Always feel proud on you as you are my very sincere and lovable student and now friend.
    Thank you and best wishes for you for your future 💞😊 amazing 👍👏
    Khup chhan…

  3. मला काही गोष्टी विसरता येणार नाहीत, तशा अनेक गोष्टी, प्रसंग सरांनी ताजे केले. माझ्या शेणानं सारवलेल्या घरात शेळ्या मेंढ्या लेंड्या बाजूला सारून दुपारी घरात दुध नसताना मी चहा बनवून दिलेला… शेतातील फ्लॉवर कोबी काढून दिलेला… अशा अनेक गोष्टी जिवंत केल्या.

    सर अजूनही कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नाव आडनावावरून ओळखतात. अशा किमान चार साडेचार हजार विद्यार्थ्यांना त्यांनी लक्षात ठेवलं आहे. ऋणानुबंध जपला आहे.
    ते म्हणाले, मी डॉक्टर इंजिनिअर झालो असतो, तर करोडो रुपये कमावले असते, पण मुलांच्यात राहुन त्यांना घडवणं हे माझं फॅशन आहे….
    ग्रेट सर… आणि त्रिवार वंदन…🙏🙏🙏

  4. सुभाष आज तुझा लेख वाचला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. उत्तम लिखाण आहे तुझे. पुढील वाटचलीसाठी मनापासुन शुभेच्छा.

  5. इंजिनिअर मित्र किरण कांबळे साहेब यांची प्रतिक्रिया…

    सुभाष,
    आपल्या आयुष्यातील निघून गेलेले दिवस,निघून गेलेले क्षण पुन्हा परत यावेत असं कितीही वाटलं तरी ते परत येत नाहीत…. परंतु त्या दिवसाच्या,त्या क्षणांच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी जिवंत राहतात.
    आज तुझ्या शब्दांच्या रूपाने त्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या….आणि खरंच पुन्हा ते क्षण जगल्या सारखं वाटलं…..
    आपले शिक्षक,आपले मित्र हा आपला परिवार होता आणि आहे….आपण सर्वजण ह्या परिवाराला आठवणींची शिदोरी बांधून कायमस्वरूपी जोडून ठेवू…..
    Thank you so much 🌹

    • लेखक श्री विजय (अण्णा) पराडकर यांची प्रतिक्रिया…

      नक्कीच सर,
      हीच आपण कमावलेली संपत्ती असते. पैसा काय फक्त सुख सोयीसाठी असलेले साधन आहे.
      कांबळे सर अगदी बरोबर म्हणाले आहेत.
      हीच आठवणींची शिदोरी कायम आपल्या सोबत असते. अगदी कायमची.
      या शिदोरीवर जोडून ठेवण्यासाठी आपल्या सारख्या लिहित्या हातांची गरज मात्र कधी कधी भासते. ती असावीच म्हणजे ऋणानुबंध कायमचेच जपले जातात.

      धन्यवाद…!!💐
      🚩🙏

  6. माजी विद्यार्थी व असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर श्री पवन मोरे साहेब यांची प्रतिक्रिया…

    सुभाष 👌🏻👌🏻👌🏻
    तुमच्यासारखाच काहीसा अनुभव आम्हालाही आहे. अगदी १६ वर्षानंतर आजसुद्धा सरांशी बोलताना तीच आदरयुक्त भिती, आदब जशीच्या तशी आहे.🙏🏼

  7. मेजर मेघश्याम सोनवणे यांची प्रतिक्रिया…

    खूपच सुंदर शब्दांत आपली आठवण लिहीली श्री. सुभाष जी. माझे ही डोळे पाणावलेत…..

  8. कवी लेखक श्री दंडवते साहेब यांची प्रतिक्रिया…

    खूप छान मार्गदर्शन होईल असं लेखन आहे,
    शिक्षकांनी स्वतःच्या हातावर छडी घेणे,हे मनाला खजील करणारे आहे,
    परंतु आज तसे शिक्षक नाही आणि विद्यार्थी पण नाही,
    असेल कुठे तर तो योगायोग !…

  9. [13/08, 6:09 am] Mahesh Poddar *Pune*: बरोबर आहे. आज ४० शी क्रॉस केलेल्या लोकांना आपल्या या लेखामुळे आपल्या शिक्षकांची आठवण नक्कीच झाली असणार. मला आठवते आहे. मी पण कित्येकदा घरचा अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून छड्या खल्या आहेत. परीक्षेत एका क्रमांकाने खाली उतरलो तरी आमचे सर आम्हाला घरच्यांना घेऊन यायला लावायचे आणि मग ठरलेलेच की सगळ्या वर्गासमोर आम्ही घरच्यांचा प्रसाद खाल्ला आहे आणि वर जर याने अभ्यास सोडून खेळात लक्ष घातले, वर्गात लक्ष नसले तर अशी शिक्षा करा की परत हा चुकला नाही पाहिजे असं सांगितले जायचे. पण आज मी जे काही आहे ते त्यावेळच्या शिक्षकांनी माझ्यावर केलेल्या संस्करा मुळे आहे. *खूप खूप धन्यवाद*

  10. [13/08, 9:32 am] Dashrath Guldagade *Shivaji Nagar Pune* Defence Retired: आज अक्षरशः शाळेत असल्यासारखे जाणवलं, आमच्या बाबतीत जे घडून गेलं, ते तसाच्या तसं समोर आहे, याची जाणीव झाली, लेख फारच उत्तम, लेखकाला मनापासून धन्यवाद, आणि त्यांचे आभार देखिल 👏👏👏

  11. [13/08, 9:53 am] Ashok Nagpure *Chembur Mumbai* 9969028593: नमस्कार।।🙏
    श्री. एस. बी. पाटील सरांच्या शिकवणुकीचे, शिस्तीचे आणि प्रेमळ स्वभावाचे दर्शन घडविणारे श्री. सुभाष मंडले लिखित *उंबराचे फुल* हे कथानक फार आवडले.

    आर्थिक स्थिती खचलेल्या माझ्या आयुष्याला वळण देण्यासाठी मला शाळा आणि महाविद्यालयीन प्रवेशफीसाठी सहाय्य करणारे अनुक्रमे श्रीमती बक्षीबाईसाहेब ह्यांना नमस्कार 👏
    आणि कै.श्री. खटकूळसर ह्यांचे स्मरण🍀🙏🍀 केल्याशिवाय मला रहावत नाही.

  12. [13/08, 9:21 am] Shantaram Mane *Mayni Tal Khatav Satara* now *Mumbai” BMC: शिक्षण किती छान होते हा लेख वाचून मला माझी चाळीस वर्षे मागचे दिवस आठवले धन्यवाद सर मनापासून आभार

  13. [13/08, 9:02 am] Nilkanth Vidhate *Nagar* Ex Forester 7588947853: छान लेख जुन्या आठवणी पाटील सराबरोबरच आईची आठवण झाली खूप त्रास झाला जीव वैतागला तर आई स्वतःचे तोंड झोडून घेत असे संताप व्यक्त करायची पद्धत मुलांनी त्रास दिला किंवा इतर गोष्टीचा संताप झाला असेल तर पाटील सरासारख व्यक्त होणं होत ते जुनी देव मानस होती ती पावलोपावली नीतिमत्तेची शिकवण अडाणी पद्धतीने देत होती अहो शिक्षण काय डिग्री घेतलेले देतात अस नाही शाळेतच शिक्षण मिळत अस पण नाही सामाजिक धार्मिक कार्यक्रम बाजारपेठ रानशेत ह्या सर्व ठिकाणी आचार विचाराचं शिक्षण मिळत होत.आणि पिढी घडत होती आजच्या मूर्ती थर्माकोलच्या प्लॅस्टिकच्या तकलादू मिळतात पण जुन्या काळी टाकीचे घाव घालून दगडी मुर्त्या बनवल्या जात ज्या शेकडो वर्ष टिकतात तशीच पिढी जीवनभर चुकणार नाही अशी तयार केली जात होती मी सुद्धा कॉलेजमध्ये सरांची खाडकन तोंडात थप्पड खाल्ली होती. धन्य ते शिक्षक थप्पड मारणारे सुद्धा तितके तोलामोलाचे होते गुरू शिष्य नात ते हेच असत आणि नक्कीच असावं.पाटील सरांची अफलातून पद्धत होती आणि क्वचित पहावयास मिळणारी च होती पण मनाला अद्दल घडवणारी होती धन्य ते गुरुवर्य.

  14. [13/08, 8:33 am] Sangita Sanjay Dandge: 👌👌👌👌🙏🏻
    [13/08, 10:50 am] Dipali Modak: 🙏मातृ देवो भव, 🙏पितृ देवो भव, 🙏नंतर आचार्य देवो भव हे अगदी सार्थ ठरविले यांच्या सारख्या शिक्षकांनी🙏🌹🙏

  15. [13/08, 11:21 am] VK Mathpati Aurangabad *9325212565* Director Polytechnic & MBA Institute: श्री. सुभाष मडले लिखीत ” उंबरांच फुल- संस्कारमूर्ती श्री. एस. बी. पाटील सर ” नावाची कथा वाचून झाली. — Jr. College मधली मुले आणखीन School च्या संस्काराचीच असतात.

  16. [13/08, 11:43 am] VK Mathpati Aurangabad *9325212565* Director Polytechnic & MBA Institute: त्यामुळे Chemistry च्या पाटील सरांनी हातात छडी घेऊन शिक्षा करणे गैर नाही. जेंव्हा College च्या सभाग्रहाचा वापर दार बंद करुन क्रिकेटच्या खेळासाठी वापर केला जातो तेंव्हा हा गैरवापर समजून पाटील सर त्याच छडीने स्वतःला शिक्षा करुन घेतात. कारण संस्कार करण्यात आपणच कमी पडलोत असे त्यांना वाटले. पण या क्रतीचा सकारात्मक असा परिणाम सभाग्रहामधल्या साऱ्या मुलांवर झाला हेच फलित ठरले.– धन्यवाद,

  17. [13/08, 3:55 pm] Dr Hanumant Gawade *Phaltan* 97633 29678: लेखक सुभाष मंडले यांनी उंबराचे फुल ,संस्कार मुर्ती श्री एस बी पाटील सर यांनी छडी वाजे छम,छम विद्या येई घम घम अगदी बरोबर आहे, जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे छान लेखन केले आहे.👌👌👍👍

  18. [13/08, 8:19 am] Pandurang Ghodekar *Vadgaon Kashimbeg * Tal Ambegaon *Manchar* Retd Teacher: लहानपणी गावी
    गुरुजींची छडी अनुभवली म्हणून तर इथवर पोहचलो ! गहिवरून
    आले !
    👌😌👏🏻💐
    [13/08, 6:45 pm] Pandurang Ghodekar *Vadgaon Kashimbeg * Tal Ambegaon *Manchar* Retd Teacher: आपल्या आजच्या
    लेखाचे लेखक श्री. सुभाष मंडले बरोबर फोनवर बोललो, खूप छान वाटले, त्यांना व मला सुद्दा !
    😊👏🏻

  19. [13/08, 3:43 pm] Vandana Apte Osargaon: कित्ती कित्ती सुंदर लेखन, डोळ्यात पाणी आलं आणि आमचं शालेय, संस्कारक्षम जीवन आठवलं ” धन्य धन्य ती शाळा आणि धन्य धन्य ते आमच्या वर अलोट प्रेम करणारे आमचे गुरूजी ” कि ज्यांनी ही अक्की पिढी घडविली 👏👏👏👏

  20. [13/08, 2:52 pm] Nandini Deshpande: Khoopach chaan ahe katha
    [13/08, 2:53 pm] Nandini Deshpande: Asech shikshak asavet terach bharatache bhavitvya Ujjwal hoil
    [13/08, 2:54 pm] Nandini Deshpande: Aajkal mulanna punish kele ter palakach oradtat

  21. सर आपल्या विद्यार्थ्यांनी आपले शब्दाच्या माध्यमातून रेखाटलेले व्यक्तीचित्र अत्यंत समर्पक आहे. विद्यार्थी हाच खरा शिक्षकाचा परीक्षक असतो. त्याने केलेल्या मूल्यमापनावर कोणीही प्रश्नचिन्ह उभारू शकत नाही.त्यामुळे या विद्यार्थ्याने आपले परीक्षण करून समाजापुढे एक आदर्श शिक्षक कसा असतो याची प्रचिती दिली आहे. हीच आपल्या कार्याची पोचपावती असून आपल्याला मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे.

    सर
    आपली कामावरील श्रद्धा, विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता, सर्वांशी असणारे मैत्रीचे संबंध, आपली भाषा, आपले आचार, विचार आणि व्यक्तिमत्त्वातूनच आपण ग्रेट आहात याची अनुभूती येते.

    आज ज्या विद्यार्थ्यांने आपल्याविषयी चार शब्द लिहिले आहेत ते केवळ एका विद्यार्थ्याचे नव्हे तर आज वरच्या शेकडो विद्यार्थ्यांची ती भावना आहे. त्यांच्यासाठी आपण आयडॉल आहात. या लेखाखाली आलेल्या अनेक प्रतिक्रियेतून ते स्पष्ट होते.

    आपल्यासारख्या गुणवंत आदर्श शिक्षकाची आज समाजाला गरज आहे. आपण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर करत असलेले संस्कार अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत आहे.

    कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या बंद हॉलमध्ये अभ्यासाच्या वेळी खेळणाऱ्या मुलांचा प्रसंग हृदयाला स्पर्श करून जातो. त्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षा करू शकत होता.मात्र आपण तसे न करता स्वतःलाच दोष देऊन मीच कुठेतरी कमी पडतो आहे असे म्हणून स्वतः शिक्षा करून घेतली. आयुष्यभर स्मरणात राहील असा हा योग्य वेळी योग्य संस्कार करून आपण खरोखरच एक आदर्श शिक्षक आहात याची परिनीती दिली आहे. या उत्तम संस्काराने या विद्यार्थ्यांचे आपण मत परिवर्तित केले. खरंतर हा प्रसंग वाचताना माझेही डोळे पाणावले.

    केमिस्ट्री सारखा आपला विषय असतानाही आपण अनेक विद्यार्थ्यांचे चाहते आहात हे केवळ आपल्या स्वभावामुळे शक्य आहे.

    आज मोनिका डॉक्टर झाली आहे. सोनू च करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. शिवम ही ऑलराऊंडर आहे.आपण विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे करत असलेल्या कार्याची परतफेड आपल्या बाबतीत परमेश्वर अशी दुपटीने करत आहे. हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

    आपल्या माध्यमातून असेच अनेक विद्यार्थी घडो. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत.
    याच या निमित्ताने सदिच्छा धन्यवाद

    *आष्पाक आत्तार ✍️*

- Advertisment -spot_img

Most Popular