Homeकृषीआम्ही लाखांचे पोशिंदे आहोत आमच्या अब्रूचा पंचनामा करू नका

आम्ही लाखांचे पोशिंदे आहोत आमच्या अब्रूचा पंचनामा करू नका


नैसर्गिक अनैसर्गिक संकटे ( महापूर ,दुष्काळ, भूकंप, वादळे, जातीय दंगली, हिंसाचार, महामारी इत्यादी )आली की त्या भागातील लोकांना मदत करण्याची रीत प्राचीन काळापासून आहे. आणि ते समाजासाठी व मानव जातीसाठी बहूपयोगी आहे, शासन व्यवस्था व सामाजिक संस्था काही मंडळे व संघटना राजकीय अराजकीय समाज सेवक ते काम पूर्वीपासून करत आलेले आहेत ,मात्र काही काळापासून मदत करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे, त्याचा अनुभव कोरोना काळात आपण सर्वांना आलेला आहेच, त्याबद्दल फारसे काही लिहित नाही उदाहरण द्यायचे झाले तर एक केळी देताना पाच लोकांनी हात लावून फोटो काढणे, असो ज्याची त्याची रीत. वरील संकटांन पैकी दुष्काळ नावाचं संकट (ओला किंवा कोरडा) सर्वात वाईट आणि ते संकट फक्त आणि फक्त शेतकर्‍यांच्याच नशिबी असतं, कधी कमी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर कधी जास्त पावसानं पुरान, वादळानं, शेतकरी नेस्तनाबुत होतो. मग सर्वात आधी विरोधी पक्षातील लोकांना शेतकऱ्याचा कळवळा येतो ते सरकारला धारेवर धरतात आपल्या कार्य काळामध्ये शेतकऱ्याची अवहेलना केलेली असली तरी ते आता नुकसान भरपाई साठी रस्त्यावर येतात आंदोलने करतात, शेतकऱ्यांसाठी जीव द्यायला तयार राहतात आणि मग सत्तेच्या लोकांना जाग येते, आमदार, खासदार ,कृषी मंत्री, यंत्रणा सर्व शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामे करतात तर काही अतिउत्साही सेवाभावी महाभाग जगाचा पोशिंदा त्याला किराणा माल देऊन फोटो काढतात तेव्हा शेतकरी म्हणतो
साहेब
आम्ही लाखांचे पोशिंदे आहोत
पंचनामा करायचा
असेल तर
आमच्या नुकसान झालेल्या
पिकांचा करा
किराणामाल देतांना फोटो काढून
आमच्या अब्रूचा पंचनामा करू नका

आयुष्याची कमाई तो शेती मातीसाठी खर्च करतो, शेती उभी करतो हे सर्व करतांना त्याच्या पूर्वजांच्या कित्येक पिढ्यांनी स्वतःला मातीत गाडून घेतलेलं असतं, स्वतःच्या मुलाबाळांच्या तोंडातील घास काढून या मातीमध्ये पेरतो , ते पीक नसतच मुळी ,त्याचं काळीज असतं आणि तेच काळीज अवकाळी पावसाने महापुराण वादळानं उद्ध्वस्त होऊन जात, त्याच्या डोळ्यातील हिरवं सपान मातीत मिसळले जातं तेव्हा तो हतबल होऊन जातो, हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो तेव्हा त्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याची आशाळभूत नजर माय-बाप सरकार कडे लागून असते मात्र सरकार स्तरावरून त्याला कुठलीच मदत होत नाही, मिळतात फक्त आश्वासन भ्रष्ट पुढारी निष्क्रिय यंत्रणा निव्वळ औपचारिकता म्हणून नुकसानीचे पंचनामे करतात, राजकीय पुढार्‍यांचे व मंत्र्यांचे दौरे फक्त कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी साठी असतात भुईसपाट झालेल्या शेतकऱ्याला काहीच मिळत नाही, कारण त्याच्या विरोधात असलेली व्यवस्था, धोरणं, कायदे, या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत असतात. पिकासाठी घेतलेलं कर्ज, पिक विमा, लाईट बिल, यामध्येही त्याला काहीच मिळत नाही ,उलट समाजसेवेचे सोंग करणारे ढोंगी भामटे या लाखोंच्या पोशिंद्याला किराणामाल देऊन त्याच्या अब्रूचे पंचनामे करतात.

            -  संतोष पाटील 
              7666447112
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. वर्षानुवर्षे हे लोक लोकांना मूर्ख समजत आहेत.असाच खेळ ते कोरोनाबाबत अजूनही खेळत आहेत .लोकांच्या बद्दल त्यांना काहीही देणेघेे न नाही .ते त्यातून त्यांच्याच फायदा घेतात.

- Advertisment -spot_img

Most Popular