Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष - : श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष – : श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

📜 १६ ऑगस्ट इ.स.१२७५

दि.१६ आॅगस्ट इ.स.१२७५ रोजी मराठी भाषेतील श्रेष्ठ तत्वज्ञ आणि प्रतिभावंत कवी श्री. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्याकाठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्तघेतले. [१]
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्य रचना करताना बापविठ्ठलसुत, बापरखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावे ही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी: आदिनाथ >मच्छिंद्रनाथ >गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तीनाथ > ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी , भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्वज्ञ होते. भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) अमृतानुभव ,चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्य रचना आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

  • लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular