आजरा (हसन तकीलदार ):-पावसाळा आणि त्यातच शेतीच्या कामाना वेग यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती येत असल्यामुळे शाहू महाराजांची जयंती साजरी करताना मर्यादा येतात. या बाबींचा विचार करत आजऱ्यातील बहुजन मुक्ती पार्टी, दलित मानवी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन युवा आघाडी, रिपब्लिकन सेवा, सेक्युलर मूव्हमेंट या सर्व संघटना एकत्र येत छत्रपती लोकराजे शाहू महाराजांची 151वी जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि रविवार दि. 29/06/2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाहीर, कवी संदीप दाभीलकर यांनी आपल्या खड्या आवाजात शाहू महाराजांवरील लिहलेली कविता आणि पोवाडा सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक संदीप दाभीलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत कुट्रे (जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ ), हे होते आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सौरव देसाई (बामसेफ जिल्हाध्यक्ष )हे लाभले.
प्रास्ताविक करताना संदीप दाभीलकर म्हणाले कि, बाबासाहेबानी खुद्द सांगितले कि एखाद्यावेळी माझी जयंती साजरी करायची राहिली तरी चालेल पण ज्या राजानं ज्याचा मुलगा शाळेत येणार नाही त्याला एक रुपया दंड लावा असे म्हणत तळागाळापर्यंत शिक्षण पोहचवणाऱ्या लोकराजाची जयंती पहिला साजरी करा म्हणून तालुक्याच्या विविध संघटनांनी एकत्र येत इंग्रजांच्या काळातील जुन्या व्यंकटारावच्या इमारतीत या लोकराजाची 151वी जयंती साजरी करण्यात येत आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रशांत कुट्रे म्हणाले, सर्व संघटनाना एकत्र आणण्याचे चांगले काम डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी केले आहे. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांची हजेरी उल्लेखनिय आहे. पुन्हा एकदा आपण गुलामीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलो आहोत. ही गुलामी नष्ट करायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रा. सौरव देसाई यांनी माणसातील राजा आणि राजातील माणूस अशा लोकराजाच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची तपशीलवार मांडणी केली. छत्रपती शाहू महाराज यांची माहिती मांडताना संगितले कि, 26जून 1874साली शाहू महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मुळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे. म. फुले आणि आंबेडकर यांच्या मुलांचीही नावे यशवंत होती. यशवंत हे तिन्ही महापुरुषांना जोडणारे नाव आहे. 2एप्रिल 1894ला 20व्या वर्षी राजे म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून 28वर्षे कारकीर्द राहिली. या कारकिर्दीत त्यांनी अनेक समाजाभीमुख धाडसी निर्णय घेतले. शाळा, दवाखाने,पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी तत्कालीन अस्पृश्याना सामानतेने वागवावे असे आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. आरक्षण सुरु केलं. पुराणोक्तमंत्र आणि वेदोक्तमंत्र यावर बंड पुकारले. त्यावेळी अनेक प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता समाजसुधारणेचे कार्य अखंड सुरु ठेवले. यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, एस. पी.कांबळे,राहुल मोरे, सुरेश बुगडे,ऍड. सुनील नागदिवे, प्रकाश इंगवले, अशोक बागडी, अमित सुळेकर, भिकाजी कांबळे, दौलती कांबळे, झुल्पीकार शेख, इम्रानभाई अत्तरवाले, सईद शिडवणकर, सलीम महागोंडे, सुमन कांबळे, सरिता कांबळे, बशीर शिडवणकर, नरसू शिंदे, शरद पाटील, प्रकाश कांबळे, अजय देशमुख, काशिनाथ मोरे, सुनील कामत आदिजण उपस्थित होते.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
You Tube चॅनेल लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



