Homeवैशिष्ट्येसिमोल्लंघन

सिमोल्लंघन

दसरा हा सण म्हणजे आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक! अगदी रामायण महाभारतापासून दसऱ्याचे महत्त्व आहे.
रामाने रावणाचा दसऱ्याच्या दिवशी वध केला. पांडवांनी वनवासानंतर याच दिवशी शमीच्या झाडातल्या ढोलीतून शस्त्र बाहेर काढली आणि ते युद्ध करायला सज्ज झाले.
दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन करायचे आणि शस्त्रपूजा करायची हे दोन रिवाज सुरू झाले.

http://linkmarathi.com/रावण-समाजातला/


याच दिवशी कलिंग युद्धामध्ये जिंकलेल्या सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर आधुनिक काळात बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसमावेत दसऱ्याच्याच दिवशी धर्मपरिवर्तन केले. एका प्रकारे सिमोल्लंघनच केले.
तात्पर्य काय तर दसऱ्याच्याच मुहुर्तावर अनेक आगळ्यावेगळ्या परिवर्तनाची सुरुवात झाली.
आधुनिक काळात बाळासाहेब ठाकऱ्यांच्या दसरा मेळाव्याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले असे.
सिमोल्लंघन किंवा शिलंगण म्हणजे फक्त गावाची किंवा शहराची सीमा ओलांडणे हा लौकिकार्थ झाला.
आपण आपल्या भोवती कितीतरी सीमारेषा आखलेल्या असतात. रुढींच्या, परंपरांच्या किंवा नात्यातील बंधनांच्या! अगदी आपल्या दैनंदिन कामासाठी सुद्धा आपण स्वतःला अगदी जखडून घेतलेले असते.
आज या सिमोल्लंघनाच्या निमित्ताने आपण स्वतःला घातलेल्या सीमारेषा कशा पार करायच्या याचा विचार करायची गरज आहे. आपण स्वतःला कितीतरी अनावश्यक बंधने घातलेली आहेत यातली आवश्यक आणि अनावश्यक यातली सीमारेषा कोणती हे देखील आपल्याला ओळखता येणे कठीण होते.
उदाहरणच द्यायचे तर, एखाद्याची वर्षानुवर्षे काही ठराविक वेळेला जेवण्याची सवय असेल तर हळूहळू त्याचे बंधन व्हायला लागते. एखाद दिवशी उशिरा जेवल्याने काहीही फरक पडत नाही पण ती व्यक्ती यामुळे प्रचंड अस्वस्थ होते.ही सीमारेषा ओलांडायला दसऱ्याचा मुहुर्त उत्तम आहे.

http://linkmarathi.com/नवरात्र-आणि-उपासना/

अनेक नात्यांमध्ये, मग ती मैत्रीची असो की रक्ताची असो काहीवेळा गैरसमजामुळे किंवा कोणाच्या चुकीने दरी पडलेली असते. दोघांमध्ये एक अदृश्य सीमारेषा उभी राहाते. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही सीमा ओलांडायला हवी. कोणी तरी एकाने पुढाकार घेऊन पहा. ही रेषा ओलांडणे कठीण असेल पण अशक्य नाही.

आपल्या मनानेही आपल्याभोवती काही सीमारेषा आखून घेतलेल्या असतात. बऱ्याचदा आपण स्वतःचेच टीकाकार होतो. अधिकाधिक परिपूर्ण होण्याच्या इच्छेपोटी आपण सतत स्वतःमधल्या चुका शोधत राहातो. यासगळ्या चौकटींमुळे आपण आयुष्यातील छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्यायचाच विसरून जातो. आपण मनाच्या या सीमारेषा उल्लंघून आनंद घ्यायला शिकायला हवे.

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/

सगळ्यात कठीण आहे आपल्या मनाने उभ्या केलेल्या या भिंती ओलांडणे!!
आपल्या कक्षा रुंदावण्याचा थोडे अधिक प्रयत्न करण्याचा मुहूर्त म्हणजे दसरा!!
चला या दसऱ्याला आपण आपल्याभोवती आखून घेतलेल्या बंधंनांचे, सीमारेषांचे उल्लंघन करूया…

  • डॉ. समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular