Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक मालिका . झुंज : भाग १७

शिवकालीन ऐतिहासिक मालिका . झुंज : भाग १७

झुंज : भाग १७ –

“तुम किला फतेह कर सकते हो?” खानाने प्रश्न केला.

“जी हुजूर… पर…” मांत्रिकाच्या चेहऱ्यावर धन कमाविण्याची हाव खानाला स्पष्ट दिसली. त्याचे माथे ठणकले. पण याच्यावर काही धन खर्च करून फौजेचे मनोबल वाढणार असेल तर तो सौदा देखील खानासाठी फायद्याचा ठरणार होता. म्हणूनच तो गप्प राहिला.

“पर??? आगे बोलो…” काहीशा चढ्या आवाजात खानाने फर्मावले.

“हुजूर… वहां एक नही बहोत सारे भूत है… उन सबको वशमे करना पडेगा… उसका खर्च थोडा जादा होगा…” मांत्रिकाने सांगितले. त्याच्या चेहऱ्यावरील कुटिल भाव स्पष्ट जाणवत होते.

“आगे बोलो…”

“हुजूर… इसके लिए मुझे एक सोनेका नाग बनवाना पडेगा… फिर उसकी पूजा होगी, तो वो सिद्ध हो जायेगा. उसके बाद वो अपनी हर इच्छा पुरी करेगा. तो एक क्या सौ भूतोंपर भारी पडता है…”

“ठीक है… इसके लिए कितना खर्च होगा?” खानाने विचारले.

“उसके लिए सौ तोला सोना चाहिये…” काहीसे अडखळत मांत्रिकाने सांगितले.

“ठीक है… सबकुछ मिल जाएगा…”

“हुजूर… दो दिन बाद पुनव है… उसी दिन हम उस नाग की मदत से किला जीत लेंगे…” खानाला खुश करण्यासाठी मांत्रिक म्हणाला आणि त्यांची भेट संपली.
दोन दिवसांनी १०० तोळे सोन्याचा नाग हातात घेऊन मांत्रिक खानापुढे हजर झाला. खानाच्या शामियान्याच्या बाहेर त्याने पूजा मांडली. त्या पूजेच्या मधोमध त्याने सोन्याचा नाग ठेवला आणि तोंडाने असंबद्ध शब्दोच्चार चालू झाले. जवळपास सर्वच सैन्य अधिकारी त्याची पूजा पाहण्यास हजर झाले होते. स्वतः खान देखील मांत्रिकाचा खेळ पहात होता. जवळपास घटकाभर त्याचा हा खेळ चालला. त्यानंतर त्याने तो नाग स्वतःच्या हातात घेतला आणि गडावर आक्रमण करण्यासाठी खानाची परवानगी मागितली.

काही वेळातच खानाचे सैन्य पुन्हा तयार झाले. यावेळेस सैन्याच्या सगळ्यात पुढे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक चालत होता. त्याच्या मागोमाग काही अधिकारी आणि त्यांच्या मागे जवळपास तीन ते चार हजार पायदळ. सर्वांनी गड चढायला सुरुवात केली.

हे सगळेच किल्लेदार त्याच्या साथीदारांसह तटबंदीवरून पहात होता. आज कुणीतरी काळे कपडे घातलेला माणूस त्या सगळ्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्याच्या डोक्यावर काहीतरी चमकत होते पण ते नक्की काय आहे हे मात्र त्याला नीटसे समजले नाही. ते जसे अर्धा डोंगर चढून वर आले तेंव्हा किल्लेदाराच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्याला खानाच्या या कृत्याचे हसू आले.

“कामून हासून ऱ्हायले किल्लेदार?” तात्याने विचारले.

“ह्यो खान तर लैच येडा हाये तात्या…” किल्लेदार हसून म्हणाला.

“येडा? आन त्यो कसा?” तात्या गोंधळला.

“तात्या… आपन ऐकत नाई म्हनून त्यानं मांत्रिकाला बोलीवला… आता त्यो मांत्रिक काय करनार हाय?”

“पन किल्लेदार… त्याच्या मागं फौज बी हाय की…”

“असू दे ना… आपल्याकडं दगड धोंडे काय कमी हायेत का?” किल्लेदार हसला आणि तात्यालाही हसू आले.

“तात्या… आपल्या समद्या पोरास्नी बोलव… आन त्येंना सांग बरुबर तुमची गलोरीबी घिवून या…”

“जी किल्लेदार…” खरे तर किल्लेदार पोरांना का बोलावतो आहे हेच मुळी तात्याच्या ध्यानात आले नाही. पण किल्लेदाराने बोलावले म्हटल्यावर नाही तरी कसे म्हणणार?

काही वेळात पोरं गलोरी घेऊन किल्लेदारासमोर हजर झाले.

“कारं पोरांनो… आज युध करनार का?” त्याने विचारले आणि पोरांना आनंद झाला.

“व्हय किल्लेदार…” सगळ्यांनी एक सुरात उत्तर दिले.

“आज म्या तुमची नेमबाजी पहानार हाये… तुमी दावणार ना?”

“व्हय…”

“मंग आता गडाच्या खाली पघा… त्यो काळा डगला घातलेला मानुस हाय नव्हं, त्याच्यावर समद्यांनी गलोरी तानायची.” गड चढत असलेल्या मांत्रिकाकडे बोट दाखवत किल्लेदाराने सांगितले. मांत्रिकाकडे पाहिल्यावर पोरे थोडीशी गडबडली.

“त्येच्यावर?” त्यांच्या स्वरात गोंधळ उडालेला पूर्णतः दिसून येत होता.

“व्हय…”

“पर किल्लेदार…”

“का? काय झालं?” किल्लेदाराने विचारले.

“माजी आय म्हनते, सादूच्या आन मांत्रिकाच्या नादी लागायचं नाय…” त्यांच्यातील एक जण उत्तरला.

“कामून?”

“आवं… त्ये लोकं आपल्यावर खाक फुकून पाखरू बनिवता, उंदीर बनिवता. कदी कदी त दगुड बी बनतो मानसाचा…” त्याने सांगितले आणि किल्लेदाराला हसू आले.

“आरं… असं काय बी नस्तं. आन त्यानं अशी खाक फुकली त आपला देव हाय ना… ह्यो रामाचा गड हाये. रामाचं नाव घेतलं की भूतं बी पळत्यात. ह्यो तर मानुस हाये…” किल्लेदाराने सांगितले आणि पोरं विचारात पडली.

“काय बरुबर ना?”

“जी किल्लेदार…” पोरांनी एकसुरात उत्तर दिले.

“मंग घ्या रामाचं नांव आन ताना गलोरी त्या बाबावर…” किल्लेदाराने सांगितले आणि मुलांच्या गलोरी ताणल्या गेल्या.

मधूनच वर पहात अगदी सावधपणे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक गड चढत होता. त्यालाही तटावर माणसे दिसत होती. मनातून तो पूर्णतः घाबरला होता. कुठून आपण सोन्याच्या मोहाला बळी पडलो आणि या ठिकाणी आलो असेच त्याचे मन त्याला सांगत होते. पण आता वेळ निघून गेली होती. मागे मुगल सैन्य असल्यामुळे परत फिरणे त्याला शक्यच नव्हते. त्याचा हाच विचार चालू होता आणि एक छोटासा दगड त्याच्या कपाळावर लागला. त्याच्या तोंडून आवाज निघतो न निघतो तोच एका पाठोपाठ एक दगड त्याच्या अंगावर आपटू लागले. त्याच्या हातून सोन्याचा नाग केंव्हाच दूर जाऊन पडला. तो खाली कोसळला तरीही दगडांचा मारा संपला नव्हता. त्या छोट्या दगडांनी त्याला कित्येक जखमा केल्या होत्या. त्याच्या आरोळ्यांनी आसमंत दणाणून गेले. आजपर्यंत त्याने सांगितले म्हणून कित्येकांना दगडाने ठेचून मारले गेले होते. त्या सगळ्याचे फळ त्याला या रूपाने मिळत होते. काही वेळातच त्याचा आवाज बंद झाला आणि गडावरून परत एकदा मोठे दगड गडगडत येण्यास सुरुवात झाली. खानाच्या सैन्यात हाहाकार माजला. यावेळेस जो मोठे दगड वाचवत होता त्याला गलोरीचा प्रसाद मिळत होता. दोन ते तीन घटकातच जवळपास हजारएक लोकं कामास आले आणि मागे असलेले सैनिक पुढच्या तुकडीची ही गत पाहून मागच्या मागे पळून गेले.

खानाच्या हा डाव देखील नेहमीप्रमाणे त्याच्यावरच उलटला.

क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular