आजरा(हसन तकीलदार):-साधारणपणे मे च्या मध्यान्हापासून पावसाने फलंदाजी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना धड पेरणी ना धड कापणी करायला देत आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची कापणी -मळणी सुद्धा करता येईना. त्यामुळे सर्वच पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. यासाठी सर्वच शेतकऱ्यांना पंचनामान करता सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन भाकपने आजरा तहसीलदार समीर माने यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील सहा -सात महिन्यापासून सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भुईमूग, सोयाबीन, नाचणा, भात, ज्वारी इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे व ऊसाच्या पिकाची सततच्या पावसामुळे वाढ झालेली नाही. त्यातच मावा, तांबेरा यासारख्या रोग व किडीमुळे ऊसाचे वजन व एकरी उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चच जास्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे हाताला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. म्हणून कोणताही पंचनामा न करता सर्वांनाच नुकसान भरपाई मिळावी. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणे अवघड झाले आहे. या नुकसानीमुळे मुलांचे शिक्षण, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण व बँक कर्ज इत्यादी सर्वबाबीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्याचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करणेबाबत आपले स्तरावर शासनाला कळवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
यावेळी कॉ. शांताराम पाटील, कॉ. नारायण भडांगे, कॉ. संजय घाटगे, कॉ.नारायण राणे, मनाप्पा बोलके, शांताराम हरेर, गणपती ढोणूक्षे, दौलत राणे, निवृत्ती मिसाळ, हिंदुराव कांबळे, महादेव होडगे, धोंडिबा कुंभार, सुनील कडाकणे, विठ्ठल बामणे यांच्यासह भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
“ग्लॅमर नाही, सत्य पाहिजे!”
जर तुम्हाला अभिनेत्रींच्या पोज नाही तर बातमीमागचं सत्य हवं असेल —
तर फक्त एक काम करा 👉 Link Marathi चॅनेल Follow, Subscribe आणि Share करा!
🎯 सत्याशी जोडलेले राहा, कारण आम्ही बातमी नाही — दिशा दाखवतो!
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



