Homeमुक्त- व्यासपीठनोकरदार स्त्री … ..

नोकरदार स्त्री … ..

नोकरदार स्त्री … ..

स्त्री च जीवन म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या त्यात लग्नाअगोदरचे आयुष्य वेगळेच पण लग्नानंतर मात्र खांद्यावर येणाऱ्या जाबाबदाऱ्या अगदीच हळुवार पणे एक एक करत येत जातात. आज नोकरी करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आपण पाहतो. लोकल चे स्त्रियांचे डबे पाहिले तर उभं राहायला हि जागा नसते. मग ते केवळ मुंबई च नव्हे त्यात इतरही भाग, प्रदेश, ठिकण यांचा समावेश होतो.

स्त्रीने नोकरी करावी का नाही ? “नोकरी ” हेच जर स्त्रीच्या लग्नानंतरचा फलित असेल तर नको तो संसार एकटच कुठेतरी दूर जाऊन संन्यास घ्यावा एकांतात अगदी एकटाच राहून जीवन काढाव असं म्हणणाऱ्या कितीतरी स्त्रिया जवळजवळ नोकरी करणाऱ्यांमध्ये किमान दहा स्त्रिया मागे ७-८ स्त्रिया असतात याचा अर्थ काय ? परत एकदा स्त्रिया भरडल्या जात आहेत फरक एवढाच क्षेत्र किंवा स्वरूप बदललेल आहे स्त्री ने नोकरी करावी का नाही याचे उत्तर प्रत्येकाच वेग वेगवेगळे असते , ते परिस्थितीवर व विचारसरणीवर अवलंबून असतं .

बऱ्याच वेळा ते विचार तिच्या स्वतःवरही असतात आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगण पडत असताना तिने घरात बसणं हे हि शक्य नाही किंबहुना तिच्यामध्ये खरी प्रगतीची बीज आहेत आज जवळजवळ सगळेच क्षेत्र तिने काबीज केले आहेत.

तुझं पंख दिले देवाने
कर विहार गगनावरती !

देवाने तिला बुद्धिमत्ता दिली ,त्याचबरोबर सहनशीलता, प्रेमळ अंतःकरण, सामंजस्यपणा आहे त्या जोरावर तिने आकाश पाताळ जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवला आहे पण यावर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होतो तर एकीकडे ती भरडली हि जाते. दहा ते सहा ऑफिस मध्ये काम करणाऱ्या स्त्रीया सगळ्यांनाच खूप सुखी आनंदी वाटतात., पण दहा वाजता ते ऑफिसला येते म्हणजे तिला सकाळी नऊ साडेनऊला घर सोडाव लागते किंबहुना काहींना यापेक्षाही लवकर तेही घरातले सर्व काम उरकून काही राहिलं नाही ना याची वारंवार खात्री करून घ्यावी लागते. सकाळी पाच-सहाला उठून नऊ पर्यंत म्हणजे तीन चार तासात तिला दिवसभराचे सगळं घर काम करायचं असतं सगळ्यांचे लाड हट्ट पुरवायचे शिवाय ऑफिसला येताना जेव्हा तिचा बाळ आई ऑफिसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाणी नजरेने पाहते तेंव्हा तिला जाऊ नकोस ना म्हणून सांगते तिच्याकडे हट्ट धरते तेव्हा तिची घायाळ मनाची होणारी स्थिती कोणालाच दिसत नाही त्या इवल्याश्या चिमण्या जीवाला घरी सोडून जाण तिच्या किती तरी जीवावर येत.

दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा इवलासा चेहरा दिसतो तिला किती त्रास होत असेल याची कोणी विचारही करत नाही उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिच्या नोकरीवरच आक्षेप घेतला जातो.

एवढं स मूल सोडून कुणालाही नोकरीवर जाण्याची हौस नसते तर ती गरज आहे कारण आजकालच्या या महागाईच्या जमान्यात पुरुष एकटाच सगळं कसं चालवू शकेल ? मुलांना उज्वल भवितव्य द्यायचे असेल, चांगले शिक्षण द्यायचे असेल, त्यांना आपल्यासारखा संघर्ष करावा लागू नये, सर्व सुख सुविधा उपलब्ध द्यायला हव्यात त्यात आपल्या मधल्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे म्हणून ती नोकरी करत असते.

अश्यावेळी बाहेरच्यांच जाऊदे पण घरातल्याच काय ? ती घरातल्यांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून राब राबते . पण तिच्या वाटेल तिच्या कष्टाचे काहीच किंमत नाही का ? का तर चकाचक ऑफिसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते, थंडगार एसीमध्ये चहा घेते, चांगले चांगले कपडे घालते म्हणजे ती त्या एसी असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का ? तिला फुकट पगार मिळत असेल का ? आज काल सखा भाऊ भावाला एक रुपया सोडत नाही मग तो कंपनीचा मालक काय दानशूर कर्ण लागून गेलाय का ? की काही काम न करता फुकट पगार देईल.

पण त्याच कंपनीत पुरुष सुद्धा काम करतात त्यांना बाहेरचं काम काय असतं किती वाजतात हे ही माहित असतं तरी देखील घरी आपल्या बायकोने काहीच काम केलं नाही व आपण खूप मोठा डोंगर फोडून आलोय या अविर्भावात टीव्ही बघत एक एक आज्ञा देत असतात व नम्र सेवकाने कुरकुर न करता व पटापट त्या ऐकल्या पाहिजेत ही अपेक्षा असते म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वतःच पैसे देणारी कायमस्वरूपी कामवाली मिळाल्यासारखं वागवत असतात. यात काही सर्वच पुरुष असे असतात यातला भाग नाही , ते ही खरेच स्त्री सारखे घरी राबतातही हि सर्वच काही असे आज्ञा देत नाहीत . स्वतः हि स्वयंपाकास मदत करतात व कामही वाटून घेतात. गरज पडल्यास तिचा हि डब्बा बनवून देतात , धुण्यापासून केर काढण्या पर्यंत सर्व काम करतात.
त्यांच्यात समजूतदार पणा असतो.

आपल्या ला जेवढं काम आहे तेवढच काम सोबत असणाऱ्या स्त्री सहकार्याला असत हे माहीत असतानाही तिला ऑफिसमध्ये काहीजण कमी लेखतात .
तिला घरही सर्व काम उरकून यायला किंवा कधी बस चुकली किंवा कधी इतर काही कारणामुळे उशीर होतो तेव्हा लगेच त्यावर चर्चा , लगेच लेट मार्ग लावला जातो , कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर त्यांना खरीखोटी सुनवायला मागे पुढे पाहिलं जात नाही. कधी मुलांना बरं नाही म्हणून लवकर गेले तर त्यावर लेक्चर ऐकावं लागतं आणि घरी नाही गेल तर इकडे हिचा जीव तुटत असतो. जरा कुठे कमी पडली तरी घरचे बोलणार व ऑफिसमध्ये काही कमी जास्त झाले तरी ऑफिसमध्ये बोलणार. स्त्रीसाठी खरी हि २ विश्वच असतात.

पण दोन्ही ठिकाणी जर ती भरडून निघत असेल तर नको हे जीवन आता संन्यास घ्यावा व निघून जाव कुठेतरी असेच ती कंटाळून म्हणणार ना. शेवटी काही हि परिस्थिती असेल तरीही डगमगून न जाता पुन्हा उभी न राहील ती स्त्रीच कोणती नाही का .

अशीच बरीच उदाहरण आहे त्यातील एक जिवंत उदाहरण माझ्यासमोर हि होते अगदी उच्चशिक्षित इंजिनिअर झालेली ती स्वतःच्या कामात खूप हुशार, वरिष्ठ बॉस सगळेच तिच्या कामावर खुश , शिवाय तिने लव्ह मॅरेज केलं त्यामुळे नवराही प्रेमळ की आप मतलबी कदाचित पण तिने नोकरी केलीच पाहिजे या मताचा शिवाय तिलाही नोकरीची आवड असल्याने तिचाही व त्याचाही प्रॉब्लेम नव्हता. पण खरा प्रॉब्लेम तर पुढे होता. त्याच्या आई-वडिलांनी भावाने जे कर्ज घेतलं होतं ते या दोघांना फेडायला सांगितल तरीही तिने ते आनंदाने मान्य केले शिवाय घरचा खर्च हि त्यात आला. घरापासून ऑफिस खूपच लांब असल्याने तिला रेल्वे प्रवास करावा लागत, प्रवासात जवळजवळ चार तास जायला लागतात. इंजिनियर असल्याने तिला प्रत्यक्ष साइटवर उभं राहावं लागत.उन्हात उभ राहून काम करावं लागतं . त्यामुळे उन्हाची दगदग .

याचा खूप त्रास व्हायचा तिला शिवाय सकाळी ऑफिसला जाणार तर घरातली सर्व काम करून जायचा असा दंडक होता. कामाला बाई तर अजिबात लावायची नाही . शिवाय सुट्टीचा दिवस म्हणजे आरामाचा पण नाही तिच एवढ मोठ नशीब कुठे आहे, तर त्या दिवशी हि दुप्पट तिप्पट काम . त्यात हि तिने कुणाकडून साधी अपेक्षा हि करायची नाही. मात्र ऐकून घ्यायची तयारी ठेवायची , पण ती कधीच बोलायची नाही, कुणाच मन दुखवू नये म्हणून कुणावर रागवायची हि नाही. असच एकदा बॉस ने ऑफिसच्या कामानिमित्त तिला बाहेरगावी चार दिवसांसाठी जायला सांगितले. तिला एक परदेशी इंजीनियरकडून खूप काही शिकण्यासारख होत.

पण स्त्रीने एकटीने कुठे जाणे अजूनही तितकस समाजात मान्य ही नाही व धोक्याचे हि आहे.

तिने त्यांना प्रथम नकार दिला पण तिच्या वरिष्ठाच म्हणणं होत की तू गेलच पाहिजे . तुझ ते काम आहे. त्यामुळे तिने ऑफिस मध्ये सांगितलं की माझ्यासोबत स्टाफ ची मैत्रीण किंवा पती असतील तर मी जाईन .

पती अगोदर येण्यास तयार झाले ऑफिसमधून तिचे व तिच्या पतींचे बाहेर गावी राहण्याची व्यवस्था करण्यात झाली व जायची सर्व तयारी झाली निघायच्या ऐनवेळी तिच्या पतीने येण्यास नकार दिला, तिला अक्षरशः रडू कोसळले त्यांना अनेक परीने समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ आणि तू सुद्धा जायचं नाही असे स्पष्ट सांगितलं शेवटी नवऱ्यापुढे तिचे काही चालले नाही. त्याला न जुमानता जाता आले असते पण…. पण पुढे भांडण वाढले असते त्यामुळे ती स्वतःच्या मनाला समजावत राहिली . एका सुशिक्षित पुरुषांनी केलेला हा मानसिक छळच नाही का ? फक्त स्वरूप वेगळ दारू पिऊन मारामारी करणारा नव्हता. जेव्हा खरी मदतीची गरज असते तेव्हा मात्र मागे खेचणं याचा उपयोग काय ?

ती दुपारी जेव्हा ऑफिसला गेली तेव्हा तिच्या बॉसने बेजबाबदार म्हणून सर्वां समक्ष तिला बोलले तुम्हाला काम करायला जमत नसेल तर घरी जाऊन बसा … या शब्दात तिला सांगितलं जे वरिष्ठ तिच्या कामाची स्तुती करायचे तेच जेव्हा तिला बेजबाबदार म्हणून तिचा या शब्दात अपमान करतात तेव्हा तिच्या इतके दिवस प्रामाणिकपणे काम करण्याचा काय उपयोग झाला.

खरंच या सगळ्यात तीच काय चुकलं उच्च शिक्षित स्त्रीच असेल तर अडाणी गावंढळ म्हणून जगणंच चांगलंच ना. .. ? बरं गावंढळ जरी राहील तरी तिथे हि नोकरी आलीच कि , घरची काम आवरून कुणाच्या तरी शेतात राबणे आले , कुठंतरी रस्त्याचे दुरुस्तीचे काम आले , किंव्हा कुणाच्या इथे घर बांधावयाची असतील तर तिथे मजुरीला जावं लागणे, नवरा दारुडी असेल तर पाहायलाच नको घरचा सर्व भार तिच्यावरच शेवटी शिकून आणि न शिकून जबाबदारी हि आहेच. राबायचं तर सगळीकडे आहे. शिवाय घरी स्वयंपाक आणि घरची सर्व काम करण्याचा मोबदला तर कधी मिळतच नाही त्याचा पगार तर काहीच नसतो पण जगातल्या कोणत्याही कामाच्या यादीत नाव काढले तर एक गृहिणी चा पगार सर्वात जास्त निघेल आणि हे खरच आहे.

खरच प्रत्येक नात्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे , वेळ बदलेल तसे विचार बदलण्याची गरज असते आपल्या व्यक्तींना त्यांच्या विचारांना समजून घेण्याची गरज असते. एक वेळ असा होता स्त्री घरा बाहेर फारशी येत नव्हती पण कालांतराने घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या गेल्या त्यात तिने आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे चालण्याचा प्रयन्त केला आणि यशस्वी हि झाली. आज ती नोकरी आणि घर हि उत्तमरीत्या सांभाळू शकते.

आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. ह्या लिखाणाचा माझा उद्देश कोणतेही ऑफिस किंव्हा कुणाच्या घरच्यांवर आरोप करण्याचा नाही. तर असा आहे कि आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया या नोकरी करणाऱ्या आहेत. मग त्या कोणत्याही क्षेत्रात असो.

तेव्हा ती स्त्रि आपली कोणीतरी आहे, कोणाची बायको, मुलगी, बहीण, आई तसेच ती एक संवेदनशील व्यक्ती आहे तिच्याकडे फक्त इंजिन म्हणून न पाहता ती लवचिक , प्रेमळ ,सहनशील, वात्सल्यमयी आहे. तिला घरच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हात हवाय तर ऑफिसच्याकडून आपुलकीचे चार बोल व मदतीची अपेक्षा आहे. आज बऱ्याच स्त्रिया दिवसभरच्या कामाने कंटाळलेल्या असतात पुन्हा त्यांना घरच्या कामाकडे वळावं लागत . तो हि २ -२ तास प्रवास करत घरी पोहोचतात . घरातील व्यक्तीचे आपुलकीचे २-४ शब्द , जिव्हाळा मिळाल्याने त्या पुन्हा खुश होऊन काम करू लागतात.

नोकरदार स्त्रियांमध्ये मुख्यत्वे पुढीलप्रमाणे आजार आढळतात ताण, डिप्रेशन, डोकेदुखी, मळमळ, भुकेचा अभाव, झोप न येणे, हायपर टेन्शन, कोलेस्ट्रेरॉल, स्थुलता, पाठदुखी, अनियमित मासिक पाळी .
तुमच्या तील प्रत्येक नात्याने प्रत्येकाला समजून घेतले , त्यांच्या कार्याला समजून घेतले तर कोणीही अश्या प्रकारे आजारी नाही पडणार..

आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवून खरंच मनापासून प्रयत्न केले तर तिला एक खरंच एक मानाच स्थान मिळेल. जर ती समाधानी आनंदी असेल तर निश्चित घराचा व समाजाचा विकास होईल तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसल्याने अवघ विश्व आनंदाने भरून जाईल सारी सृष्टी नव्या नवरीसारखी हिरवी सुंदर वाटायला लागेल तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालाही पाझर फुटतो . तिच्या स्पर्शाने परिसराचे हि सोने होते.

@@

समजून घ्या तिच्या डोळ्यातल्या प्रत्येक घटनेला ,
बोलून दाखवत नाही ती ,
आई वडिलांचं घर सोडून तुमच्या अंगणात वाढते ,
त्या घराला घरपण देत असते ,
कधी पावसाळयात आल्याचा चहा होते ,
तर कधी कुणाच्या आजारपणात उपाशी हि झोपते.

समजून घ्या तिच्या मनातल्या प्रत्येक भावनेला,
काही मागत नाही ती तुमच्याकडे ,
साथ तुमची हवी असते .,
राब राब सकाळपासून रात्र होते
मुलगी ,सून , बायको , आई आणि आजी
झीजून जाते तुमच्यासाठी कायमचीच ती तुमचीच असते .. ..

शेवटी शेवटी इतकंच बोलेन
बँक बॅलन्स काही शिल्लक राहत नाही
आई बाबा नवरा मुलाबाळां साठी सर्व करून जाते …..
आयुष्याच्या घटका मोजत असताना सर्वाना सुखात राहूदे
इतकंच देवाकडे मागत असते
ती एक स्त्री च असते … ती एक स्त्रीच असते …..

स्त्री वर जितके लिहू तितके थोडेच आहे .नोकरदार स्त्रियांमध्ये जे आजार आढळतात त्यासाठी त्यांनी काय उपाय केले पाहिजे यावर एक लेख लिहिण्याचा प्रयत्न नक्की करेन तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट मध्ये लिहू शकता तसे त्यावर मलाही लिहिता येईल.

धन्यवाद…..!

सौ . रुपाली शिंदे

भादवण ( ता. आजरा)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular