Homeमुक्त- व्यासपीठते चिखलात रुतलेले कमळाचे फुल

ते चिखलात रुतलेले कमळाचे फुल

                आकाशात उंच भरारी घेणारा पक्षी पाणी पिण्यासाठी तळ्याकडे आला. मन भरून पाणी प्यायले आणि तृप्त झाला. आजूबाजूला नजर फिरवत म्हणाला  किती छान दृश्य आहे हे ! 

तेवढ्यात त्याची नजर तिथेच असलेल्या सुंदर मोहक कमळ फुलाकडे गेली. ते गुलाबी रंगाचे कमळाचे फूल अतिशय सुंदर होते. जणू काही लक्ष्मी त्याच्यावर साक्षात विराजमान आहे असेच भासत होते. नकळत ते पक्षी कमळाच्या फुलाकडे आकर्षित झाले आणि त्याला जाऊन म्हणाले, “तू किती सुंदर आहेस.” त्यावर कमळाचे फुल स्मित हास्य करीत म्हणाले, “ही तर माझ्यावर ईश्वराची कृपा आहे त्यांनी मला इतके सुंदर बनवले.” हे ऐकताच पक्षी लगेच म्हणाले. ही कसली कृपा, ही तर शिक्षा आहे. तू इतका सुंदर असूनही तुझे पाय चिखलात रुतलेले आहेत. मला बघ मी उंच आकाशी उडतो मला अडवणारा, टोकणारा, माझ्यापर्यंत पोहोचणारा कोणीच नाही, पण तू तर या चिखलात रुतलेल्या तुझ्या पायामुळे तुझे सौंदर्य जगाला दाखवूच नाही शकत. मग अशा सौंदर्याचा काय उपयोग ?
पक्षाचे हे बोलणे कमळाचे फुल शांतपणे ऐकत होते. याचे त्या पक्षाला नवल वाटले तरीही तो पुढे बोलत राहिला. “या चिखलाने तुला बांधून ठेवलं आहे मग तू मला सांग, कसा रे तुझ्यावर भगवंताची कृपा असं तू म्हणतोस ? “
आता कमलाने बोलण्यास सुरुवात केली. मग तर माझ्यावर भगवंताची अतिशय जास्त कृपा म्हणायची. मीसुद्धा जर तुझ्यासारखा आकाशात उडू लागलो असतो तर मीसुद्धा तुझ्यासारखा स्वार्थी गर्विष्ठ झालो असतो आपल्या मातीची जाण मला नेहमी रहावी म्हणून कदाचित मला भगवंताने चिखलात रोवून ठेवलं आहे. हे कमलाचे शब्द ऐकताच पक्षी रागाने फडफडू लागले, जणू काही कोणी त्याला आरसाच दाखविला. कमळ फुल पुढे म्हणाले, “तू जरी उंच आकाशी ऊडत असलास तरी विश्रांतीसाठी मूळ मातीत रोवलेले त्या झाडांच्या फांदीवरच बसतोस, रात्री तीच झाडं तुला आसरा देतात आणि तहान लागल्यावर हेच मातीतलं तळं तुला पाणी देतं. मग एवढा गर्व अभिमान कसला रे बाळगतो. जन्माला येतो आणि मरताना मातीत मिसळून जातो मग मातीत राहायला का कमीपणा मानतोस ?
माझे आणि मातीचे इतके घट्ट नाते आहे याचा मी अभिमान बाळगतो. बघ ना माझे पाय इतके चिखलात रुतलेले असतानाही देवाच्या चरणी जाण्याचा मान मलाच आहे. मग सांग ना मी नशीबवान का नाही ?
चिखलात रोवलेले माझे पाय मला नेहमी या गोष्टीची आठवण करून देत असतात की, मी याशिवाय अपूर्ण आहे. ही जाणीव आपल्या सगळ्यांना असलीच पाहिजे. कमलाचे हे शब्द ऐकताच पक्षी नि शब्द झाले हाेते. पक्षी नंतर म्हणाले, मला माझ्या पंखांचा इतका गर्व झाला होता की मी पूर्णतः विसरून गेलो होतो की, मातीही आपली आई आहे. आईला सगळ्यात वरचे स्थान असते त्यामुळे तुझे मी मनःपूर्वक आभार मानतो कारण तू आज माझ्या डोळ्यांवरचा अहंपणा दूर केेलास.

हे शरीर नश्वर आहे सर्वांना मातीतच विलीन व्हायचे आहे मग गर्व कसला करता. अभिमान कसला बाळगता. लाखो रुपयांची विकत घेतलेली चप्पलची जोड आपण पायातच वापरतो आणि दहा रुपयाचे गंध कपाळी लावतो; पण भगवंतानेेे ज्याला त्याला जेवढी तेवढी किंमत ठरवून दिली आहे त्याचा सतत स्वीकार करुन आनंदी राहा दुसऱ्यालाही आनंद द्या. अहंपणा बाळगाल तर नक्कीच विनाश होईल.

✍️नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular