Homeवैशिष्ट्येलग्नात मंगलाष्टकं का म्हणतात व त्याचा इतिहास

लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात व त्याचा इतिहास

मंगलाष्टक म्हणजे वधू-वरांसाठी घरातील ज्येष्ठांनी आशीर्वादरूपी गायलेली आठ कडवी असतात. त्याच्या माध्यमातून उभयतांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने ही प्रार्थना लग्नाच्या मुहूर्तावर गायली जाते.

हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत.

मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे. पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.

कार्तिकी एकादशीनंतर महाराष्ट्रामध्ये लग्नाची धामधूम सुरू होते. कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दरम्यान तुलसी विवाह (Tulsi Vivah) सोहळा पार पडतो. यादरम्यान लक्ष्मीच्या रूपातील तुळशीचा भगवान विष्णू यांच्या रूपातील शाळीग्रामाचा विवाह पार पडतो. महाराष्ट्रात किशोरवयीन मुलाला देखील तुळशीच्या विवाहादरम्यान ‘नवरदेवा’च्या रूपात उभं केलं जातं. पण लग्नं मंगलाष्टक (Mangalashtak) शिवाय अपूर्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये हिंदू पद्धतीनुसार लागणार्‍या प्रत्येक लग्नामध्ये विवाहाच्या प्रसंगी मंगलाष्टकं गायली जातात.

लग्नाची मंगलाष्टकं –

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular