Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक वारसा . झुंज : भाग २२

शिवकालीन ऐतिहासिक वारसा . झुंज : भाग २२

झुंज : भाग २२ –

औरंगजेब बादशहा आपल्या आपल्या शामियान्यात बसला होता. शेजारीच तीन मौलवी कुराण आणि हदीसच्या प्रती घेऊन त्यात तोंड खुपसून बसले होते. बहुतेक कोणत्या तरी मोठ्या विषयावर बादशहाने त्यांचे मत मागितले होते आणि त्यावर धर्मशास्त्र काय सांगते याच गोष्टीची ते पडताळणी करत होते. तेवढ्यात हुजऱ्या आंत आला. त्याने बादशहाला कुर्निसात केला आणि नाशिकहून जासूद आल्याची वर्दी दिली. नाशिकचे नांव ऐकताच बादशहाने लगबगीने त्याला आत पाठवण्यास सांगितले.

“बोलो… क्या संदेसा लाए हो?” त्याने विचारले. जासुदाने कुर्निसात करून आपल्या जवळील इखलासखानाचा संदेश बादशहाच्या सुपूर्द केला. बादशहाने तो स्वतःच वाचायला सुरुवात केली. बादशहा संदेश वाचत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेच भाव दिसून येत नव्हते. संदेश वाचून झाल्यावर बराच वेळ बादशहा विचार करत होता.

“कौन है बाहर?” बादशहाने एकाएकी आवाज दिला आणि हुजऱ्या आत आला.

“जल्द से जल्द मुल्हेर के सरदार को यहां बुलानेका इंतजाम करो…” बादशाहने हुकुम सोडला.

पाचव्या दिवशी मुल्हेर किल्ल्याचा किल्लेदार सरदार नेकनामखान बादशहापुढे हजर झाला.

“नेकनामखान… तुम बडी चतुराईसे साल्हेरके किलेदारको पातशाहीकी खिदमतमे लाए थे… वहां जंग होती तो हमारा भी बहोत नुकसान होता. तुम्हारी सुझबुझसे हम बहोत खुश है… अब यही काम तुम्हे रामशेजके लिए करना है… अगर तुम ये काम करते हो तो तुमको पांचहजारी मनसबसे नवजा जायेगा और तुम्हे नगद १५००० दिये जाएंगे…” बादशहाने त्याला आमिष दिले.

“आपकी मेहेर है जहांपना… आपका फर्मान हमारे लिए खुदा का फर्मान है… थोडेही दिनोमे रामशेज आपका किला केहेलायेगा…” बादशहाला कुर्निसात करत नेकनामखान माघारी वळला.

मुल्हेर किल्ल्यावरील एका प्रशस्त दालनात तीन जण मसलत करीत बसले होते. एक होता मुल्हेर किल्लेदार नेकनामखान, दुसरा होता इखलासखान आणि तिसरा व्यक्ती होता पेठचा जमीनदार अब्दुल करीम. कसेही करून रामशेजवर चांदसितारा फडकवायचा ह्याच एका विषयावर त्यांचे खलबत चालू होते. बराच वेळ त्यांची मसलत चालू होती. शेवटी त्यांच्यात एकमत झाले आणि काहीशा प्रसन्न चेहऱ्याने अब्दुल करीम तिथून बाहेर पडला.

मुल्हेरवरून परतल्यावर इखलास खानाने आपला वेढा बराचसा ढिल्ला सोडला. वेढ्याच्या नावावर फक्त घटका दोन घटकांनी गडाच्या फेऱ्या चालू झाल्या.
आज रामशेज गडाच्या मुख्य दरवाजावर एक दूत उभा होता. त्याने दरवाजा ठोठावला. त्याची पूर्ण तपासणी करून त्याला आता घेण्यात आले. नवीन किल्लेदार आपल्या माणसांबरोबर सल्लामसलत करत बसला होता. इतक्यात हुजऱ्या आत आला.

“काये?” किल्लेदाराने विचारले.

“किल्लेदार… जमीनदार अब्दुल करीमचा मानुस आला हाये…” हुजऱ्याने सांगितले. अब्दुल करीम हा या परिसरातील एक नामवंत जमीनदार आहे हे किल्लेदार चांगले जाणून होता. पण त्याचे आपल्याकडे काय काम असावे? किल्लेदार विचारात पडला.

“आत पाठव…” किल्लेदाराने फर्मान सोडले. काही वेळातच जासूद आत आला. त्याने किल्लेदाराला मुजरा करून आपल्या जवळील खलिता किल्लेदाराच्या स्वाधीन केला. किल्लेदाराने तो स्वतःच्या ताब्यात घेऊन वाचायला सुरुवात केली. खलित्यात जमीनदाराने किल्लेदाराशी भेट घेण्याचा मानस बोलून दाखवला होता. काहीसा विचार करून आणि योग्य ती काळजी घेऊन किल्लेदाराने त्याची भेट घेण्याचे ठरवले. कोणत्याही शस्त्राविना फक्त एका व्यक्तीसह जमीनदाराने भेटीस किल्ल्यावर यावे असा त्याने निरोप पाठवला.

दिवस ठरला. वेळ ठरली आणि ठरल्या वेळेला जमीनदार अब्दुल करीम आपल्या एका माणसाला बरोबर घेऊन किल्लेदाराच्या भेटीला आला.

“बोला जमीनदार… आज इकडं कुठं?” किल्लेदाराने विचारले.

“हुजूर… हम तो सुकून पसंद आदमी है… सियासतसे हमारा क्या लेना देना?” जमीनदाराच्या बोलण्यावरूनच त्याच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला.

“नाई म्हंजी… तुमी आसंच येनार नाई हे ठावं हाये आम्हाला…” यावेळेस किल्लेदाराचा स्वर अगदी रुक्ष होता.

“गुस्ताखी माफ हुजूर… पर हम आपके लिए मुल्हेरका किलेदार नेकनामखान का संदेश लाए है…” जमीनदार एकेक शब्द अगदी तोलून मापून बोलत होता.

“मुल्हेरचा किल्ला तर मुगल बादशहाने घेतलाय ना?” किल्लेदार सावध झाला.

“जी हुजूर…”

“मंग त्याचं माज्याकडं काय काम?”

“हुजूर… आप तो जानते है… साल्हेर मुल्हेरपर मुगलोन्का अधिकार हो गया है, त्र्यंबक और अहिवंत को भी उनकी फौजोने घेरा है. यहां भी इखलास खान डेरा जमाये बैठा है. इस किलेपर ना तोपे है ना लोग. पहेले रुपाजी और मानाजी के साथ त्रंबकका किलेदार भी मदत करता था. अब वो भी नही है. रुपाजी सातारामे है, मानाजीको आपके संभाजी महाराजने कैद कर लिया… अब अगर मुगल फौजोने घेरा कडक किया तो यहां के लोग भूखे मरेंगे… और ये बात आप भी जानते हों…” प्रत्येक वाक्यावर जोर देत अब्दुल करीम बोलत होता. त्याची प्रत्येक गोष्ट खरी होती.

“मंग? काय म्हनतोय नेकनाम खान?” किल्लेदाराचा आवाज खाली आला.

“हुजूरने आपके लिए संदेसा भेजा है, अगर आप किला हमारे हवाले करते हो तो आपको पचास हजार नगद दिये जाएंगे. इसीके साथ आपको बादशहाकी तरफ से तीन हजार की मंसब और खिलत दी जायेगी.” अब्दुल करीमने एकेक आमिष दाखवायला सुरुवात केली.

“ये भी सोच लिजिए… संबाजी आपको कोई वतन नही देगा… लेकीन बादशहा सलामत की मेहेर हुई तो आप वतनदार भी बन सकते हो…” हे वाक्य अब्दुल करीमने उच्चारले आणि किल्लेदाराने वर पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर रागाची एक रेष दिसली पण अगदीच काही क्षण. त्याने लगेचच स्वतःला सावरले. आता मात्र त्याच्या डोक्यात जबरदस्त विचारचक्र सुरु झाले. कारण शेवटी निर्णय त्यालाच घ्यायचा होता. एकीकडे स्वराज्याशी बेईमानी करून स्वतःचा स्वार्थ साधायचा किंवा स्वराज्याशी इमानदारी करून येणाऱ्या संकटांना सामोरे जायचे. बरे संकटे देखील अशी की त्यात प्रत्येकाची गाठ मृत्यूशी. किल्लेदार विचार करत होता आणि जमीनदार अब्दुल करीम अगदी बारकाईने त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता.

क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular