Homeवैशिष्ट्येराष्ट्रीय पालक दिन विशेष -: काठावर पास

राष्ट्रीय पालक दिन विशेष -: काठावर पास

  सुलू चा नंबर पाहून उमाने घाईतच फोन उचलला..... बोल सुलू ...उमा या रविवारी मी येतेय तुझ्याकडे आणि स्वयंपाकाचा घाट घालत बसू नकोस , मी येताना आणेन सगळे ....तू फक्त कुकर लाव !  Always welcome चा रिप्लाय ही न ऐकता ! .फोन कट !.... काय पोरगी ही ! सदानकदा घाईतच ! पण आज फोनवरचा सुलुूचा आवाज ऐकून ती खूपच प्रसन्न , आनंदी मूड मध्ये भासत होती ......या दोघी मैत्रिणी लहानपणापासून एकत्रच वाढल्या होत्या !एकमेकांची सुख - दुःख जाणून होत्या !

   उमाला चार महिन्यांपूर्वी झालेली सुलूची भेट आठवली .....खूप टेन्शन मध्ये होती .मुळात घरी आली ती धुसपुस , रागातच ......तिचा मुलगा तन्मयला घेऊन ...तो नुकताच 10 वि ची परीक्षा पास झाला होता , त्याचे पेढे घेऊन आली होती . एक शिष्टाचार म्हणून ....मुलाच्या समाधानाकरिता.....!

   आल्यावर पेढ्याचा बॉक्स तन्मयने उमाच्या हाती देऊन नमस्कार केला ! काय किती टक्के पडले , कोणती साईड घेणार ...अशी विचारपूस करणार तेवढ्यात सुलू बोलली , अग ! काठावर पास झालाय ....कसलं काय आता ? सगळंच भवितव्य अंधारात आहे ..

बिचारा तन्मय अगदी केविलवाणा चेहरा करून , आपल्या हातून भयंकर गुन्हा घडलाय या अवस्थेत खाली मान घालून बसला …..मावशी अग 65% टक्केच मार्क्स पडलेत आणि मला कॉमर्स ला जायचे आहे …..माझ्या खेळाची आवड मला जोपासायची आहे …..एवढे बोलून तो शांत बसला .

  सुलूच्या डोळ्यात पाणी जमा झाले .....उमा अगं , किती अपेक्षा होत्या आमच्या ....याच्याकडून .....स्वतःच्या बाबांचा बिझनेस त्याने पुढे चालवावा Civil Eng. ची डिग्री घेऊन , पण ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच .....!

  थांब सुलु .....

चुकतेस तू ! तिला जास्त पुढे बोलू न देता उमा बोलली ….

 अगं चुकतेस काय .....असे का ? तुझी मुलगी क्षमाला 96% मिळालेत हे विसरू नकोस !.....क्षणभर उमाला हिला कसे समजावे कळेना तरी तिने तिला पाणी , चहा देऊन शांत केले आणि थोड्यावेळाने तिला समजावले .....

हे बघ सुलू .....मुळात तू मुलामुलांमध्ये Comparision करतेस हे चुकीचे आहे . हाताची पाचही बोटे कधीच सारखी नसतात ....मी तुझ्याशी कधी तुलना केलीय का ? आज तू एवढ्या मोठ्या पदावर काम करतेस ? माझे कोचिंग क्लास अन councelling यात मी समाधानी आहे . मला सुहासच्या फिरतीच्या ड्युटीमुळे नोकरी करता आली नाही .....माझा पूर्ण वेळ मी क्षमासाठी देतेय . तिची शाळा , क्लास , यात मी पूर्ण लक्ष घालते . स्वतः तिचा अभ्यास घेते....

  तन्मयची गोष्ट वेगळी आहे . तुम्ही दोघे दिवसभर आपापल्या व्यापात .. तो घरात आजीजवळ ....आणि स्वतःच्या परिने  अभ्यास , क्लास ...चेस या खेळाची आवड तो जोपासतोय आणि विशेष म्हणजे एवढे करूनही त्याने 65% मार्क घेतलेत ....हे भूषणास्पद आहे ... अग ,

तुझा तन्मय एवढ्या लहान वयातही सगळीकडे Chess Tournament साठी गावोगावी जातो तो ही एकटाच …न भिता , न घाबरता आणि विशेष प्राविण्य मिळवतो ! आज त्याच्या Certificates आणि ट्रॉफी , मेडल्स चा स्टॉक बघून आलेला प्रत्येक जण त्याचे कौतुक करतो अगदी भारावून जाऊन ….कलेची आवड , छंद जोपासत त्याने यश मिळवले आहे ….त्याच्या मनाचा थोडा तरी विचार कर ! आणि क्षमाचे म्हणशील तर आज एकटीने प्रवास ….कुठे जाणे एवढे डेअरिंग नाहीये तिच्यात ! …..पण एकदा का जबाबदारी येऊन पडली आणि माणूस पाण्यात पडला की आपोआप हातपाय हलवतो . फक्त आपण मोठ्या माणसांनी त्याचा जास्त issue करू नये , असे मला वाटते …..!

माणसाचं जीवनचं आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं . मार्कासाठी फारसा अभ्यास केल्याने काय होणार ? फक्त परीक्षेत मार्क्स मिळाल्याने काय मिळणार ? आयुष्याची परीक्षा ही सगळ्यात मोठी ! आपल्याला त्यात मिळणार ज्ञान सगळ्यात महत्वाचं !

 प्रत्येकाचा आयुष्याचा पेपर हा विधात्याने वेगळा काढलेला असतो आणि तो ज्याचा त्यालाच सोडवावा लागतो ....!

   सुलू मला माफ कर पण तन्मयची अवस्था बघून मी तुला फुकटचा सल्ला देतेय असे वाटते मला ! .....अग जीवनात येणारे अपयशाचे किंवा यातनाचे प्रसंग हे केंव्हाही घातक नसतात ते केवळ माणसाला यशोशिखराकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या असतात म्हणे.... तेवढ्यात घराची बेल वाजली तशी उमाच्या विचारांची साखळी तुटली !

……म्हणता – म्हणता रविवारचा दिवस उजाडला …. सुलू व तन्मयच्या चेहऱ्यावरचा ओसंडून जाणारा आनंद पाहून उमाला खूप हायसे वाटले .

तन्मयने आल्या - आल्याच पुन्हा पेढ्याचा बॉक्स हातात दिला व बोलला मावशी हे पेढे माझी स्पेन येथे होणाऱ्या Chess Tournment under 19 या प्रकारात निवड झाली , त्यासाठीचे ...उमाने भारावून तन्मयला जवळ घेतले डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला .सुलू हलकेच डोळे टिपत होती . मुलाचा कौतुक सोहळा आनंदाने पहात होती . मागील भेटीत उमाच्या अनुभवाचे बोलाने ....सुलू च्या मनातील वादळ थोपवले होते ! 

दिवसभर गप्पा – टप्पा , खाणे यात रविवार कसा सरला समजलेच नाही . त्या कालावधीत ही उमाने सुलुला व
तन्मयला बऱ्याच गोष्टी सांगितल्या …..!

  सुखाने जगण्याकरिता पालक मुलांना जर कोणता वारसा देऊ शकत असतील तर तो म्हणजे संस्काराचा , सुविचारांचा ! ..संपत्तीचा

वारसा मुलांचे भले करील याची खात्री काय ? माणसाची खरी पारख त्याच्या पैशांपेक्षा त्याच्या वरच्या संस्कारांनी होते . पैसा मिळवणे ही अवघड गोष्ट नाही पण ती टिकवणे व त्याचा योग्य उपयोग करणे हे महत्वाचे !

  तन्मय तुझ्यात आता एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालाय , मग शिक्षण , खेळ याचा ताळमेळ साधत यश कसे खेचून आणायचे हे तू ठरवायचे ! नुसती पदवी प्राप्त करून घेतल्याने शिक्षण मिळत नाही तर त्यात झोकून दे , कठोर परिश्रम करून अभ्यास कर , बघ .....नक्कीच तू 12 वी परीक्षेत उत्तम यश मिळवशील !

आणि एक लक्षात ठेवा मुलांनो …..
जीवनाच्या प्रत्येक वळणावर ,
सगळं मिळत गेलं तर…
काही गमवायची भीती आणि काही मिळवायची किंमत ….तुम्हाला
कधीच समजणार नाही..

सगळेच भारावून उमाचे councelling बोल ऐकत होते .....शेवटी घरी जायची वेळ झाली तशी सुलू बोलली मॅडम आपली फी  किती द्यायची ? तसे सगळेच जोरजोरात हसू लागले ...

पण उमाही तत्परतेने म्हणाली , फी अशी काही नाही पण 12 वी चे पेढे मात्र Distinction चे हवे ! ……सुलू च्या डोळ्यात पाणी तरळले .तन्मयने मावशीला Thank You !
I will give a strong fight !! म्हणून प्रॉमिस दिले …आणि तिचा निरोप घेऊन दोघे मायलेक आनंदाने घरी जाण्यासाठी निघाले …….!

….उमा स्वतःशीच विचार करू लागली ….खरंच ……..
Mother’s love for her son is incomparable…. It is as deep as the ocean !!!


सौ . राजश्री भावार्थी
सिंहगड रोड ,
पुणे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular